मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले संजय राठोड यांची राजकीय दमदार वाटचाल रोखली गेली आहे. वयाच्या ५० व्या वर्षी चार वेळा आमदार, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीदेखील ते होते. मात्र आता सर्वालाच कलाटणी मिळाली असून संजय राठोड यांच्या राजकीय वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संजय राठोड हे मूळचे यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव मतदारसंघातील पहुर इजार या गावचे. आदिवासींसाठी पूर्वीचा दारव्हा मतदारसंघ राखीव असल्याने राठोड यांनी राजकीय कारकिर्द घडविण्यासाठी येथेच जम बसविला. त्यानंतर मतदारसंघ फेररचनेनंतर झालेल्या दिग्रस मतदारसंघातून निवडून येतात. गेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी आणि अपक्ष अशा दोन उमेदवारांचे आव्हान मोडत मोठा विजय संपादन केला होता. पक्षांतर्गत काही त्यांचे विरोधक असून त्यामध्ये यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांचे नाव विरोधकांच्या यादीत पाहिल्या स्थानी आहे. असे असले तरी राठोड यांनी पक्षातील आणि बाहेरच्या विरोधाचा सामना करीत राजकीय वाटचाल सुरु ठेवली होती.
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री म्हणून काम पहिले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या विदर्भातील चार आमदारांपैकी राठोड यांना वनखात्याचे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. वनखाते सांभाळत असताना काही निर्णयांमुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. परंतु आत्महत्या त्यांचे नाव जोडले गेले आणि सर्वच परिस्थिती बदलून गेली. पूजाच्या आत्महत्येच्या एक दिवस आधी पूजा अरुण राठोड या तरुणीचा यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात गर्भपात करण्यात आला. या दोन्ही पूजा एकच असल्याचे म्हटले गेले आणि संजय राठोड यांच्या अडचणी अधिकच वाढल्या. भाजपने या प्रकरणावरून पकडले होते. राठोड हे यवतमाळचे पालकमंत्रीदेखील होते.
बीड जिल्ह्यातील परळीला राहणारी पूजा चव्हाण ही टिकटॉक स्टार म्हणून लोकप्रिय होती आणि तिचे यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित १२ ऑडिओ क्लिप वरून तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले. त्यानंतर राठोड यांनी या संदर्भात कोणताही खुलासा दिला नाही. त्याचबरोबर वनविभागाच्या एकाही बैठकीला तसेच मंत्रिमंडळ बैठकीलाही ते हजर नव्हते. २३ फेब्रुवारीला ते बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी संस्थानमध्ये दर्शनासाठी गेले, तेव्हा त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी त्यांनी पूजा आत्महत्येप्रकरणी आरोप फेटाळत विरोधक घाणेरडे राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता. ज्या वेळी त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली तेव्हा त्यांच्या सोबत परिवहन मंत्री अनिल परब, खासदार अनिल देसाई होते.
दरम्यान, रविवारच्या राजीनाम्याने विदर्भातील शिवसेनेचा हा वाघ जायबंदी झाला आहे. राजीनामा दिला तरी राठोड यांच्यामागचे शुक्लकाष्ट संपण्याची शक्यता नाही. कारण पोलीस चौकशीचा ससेमिरा कायम असेल.