बहुजननामा ऑनलाइन टीम – उत्तर महाराष्ट्रात भाजपचे वर्चस्व आहे. त्यातच जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांनी कायमच शिवसेनेला फारशी हालचाल करु दिली नाही. तर खडसे आणि महाजन यांच्यातील वैर सर्वश्रूत आहे. त्यामुळे महाजनांना शह देण्यासाठी शिवसेनाला खडसे हवे आहेत. जळगावमधून विधानसभेला शिवसेनेने चार उमेदवार उभे केले होते. चारही उमेदरवारांचा विजय झाला. मात्र या उमेदवारांना पाडण्यासाठी महाजन यांनी बंडखोर उभे केले होते, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. तेव्हापासून महाजन आणि शिवसेनेत वैर निर्माण झाल्याचे दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यामुळे भाजपचे नेते एकनाथ खडसे नाराज झाले होते. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. मात्र, भाजप सोडण्यावर त्यांनी काही स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष खडसेंना आपल्यासोबत घेण्यासाठी उत्सुक दिसत आहे.
महाजन यांच्याशी दोन हात करण्यासाठी शिवसेनेला खडसेंच्या प्रवेशाचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी शिवसेना नेते प्रयत्न करत आहे. मात्र, खडसे यांनी अद्याप आपले पत्ते उघड केले नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील खडसे यांच्याकडे पायघड्या टाकून ठेवल्या आहे. समर्थकांना देखील खडसे यांनी राष्ट्रवादीत जावे असे वाटत आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर संभ्रम निर्माण झाला आहे. आता मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतरच खडसे यांची दिशा स्पष्ट होईल, अशी शक्यता व्यक्त होत असताना दिसत आहे.