मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात नुकताच जिल्हा परिषदेच्या निवडणूक पार पडल्या, यात राज्यात सत्ता स्थापन केलेल्या महाविकास आघाडीला यश आलं, मात्र भाजपला म्हणाव्या तेवढ्या जागा मिळविता न आल्याने शिवसेनेनं भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे. ‘राज्यातील सत्ता हेच भाजपचं ‘टॉनिक’ होतं. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. तसेच जिल्हा परिषदांचा कौल स्पष्ट आहे. सहापैकी पाच जिल्ह्यातून भाजपला नाकारण्यात आले. भाजप आता काय करणार ?’, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या नागपुरमध्येही भाजपला पराभव चाखावा लागला यावरून शिवसेनेनं देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींवर टीकास्त्र सोडले आहे. ‘नागपूर जिल्हा परिषदेत फडणवीस व गडकरी यांच्या नाकावर टिच्चून काँग्रेसने मुसंडी मारली आहे.
फडणवीस, गडकरींच्या गावातच भाजपचा दारुण पराभव झाला. काही दिवसांपूर्वीच गडकरी यांनी शिवसेना काँग्रेसच्या रंगात रंगली असून भगवा रंग विसरली असल्याची गरळ ओकली होती. ग्रामीण भागातील जनता तुमच्या ‘बकवास’ थापेबाजीला कंटाळलीये. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीबरोबर आता जिल्हा परिषदही भाजपकडून हिसकावून घेतली. फडणवीस जिथे जिथे प्रचाराला गेले तिथे तिथे भाजप उमेदवारांचा पराभव व्हावा, यास काय म्हणावे ? नागपुरात 58 पैकी 40 जागांवर काँग्रेस – राष्ट्रवादीने विजय मिळवला.एक धुळे सोडले तर भाजपच्या चेहऱ्यावरील ‘मेकअप’ उतरला. सत्तेमुळे आलेली लाली सत्ता जाताच उतरली. ज्याच्या हाती बऱ्यापैकी सत्ता असते त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांत विजय होतो. नागपूर, नंदुरबार, धुळे, वाशीम, पालघर, अकोला अशा सहा जिल्ह्यांत निवडणुका झाल्या. त्यात धुळ्यात भाजपची निर्विवाद सत्ता आली. जर येथे महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या असत्या तर भाजप येथेही गटांगळ्या खाताना दिसला असता. मावळत्या जिल्हा परिषदेत शिवसेनेची पाटी कोरी होती. आता चार जागांवर विजय मिळविला आहे, अश्या शब्दात शिवसेनेने भाजपवर टीका केली.
‘नंदुरबार जिल्ह्यात भाजप – काँग्रेस 23-23 असे लोक निवडून आले. येथेही शिवसेनेचा तक्ता कोरा होता. मात्र, आता सात जागांवर शिवसेना विजयी झाली. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय नंदुरबार जिल्हा परिषदेत कोणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही. नंदुरबारमध्ये काँग्रेस शिवसेनेसह महाविकास आघाडी म्हणून लोकांसमोर गेले असते तर जिल्हा परिषदेतून भाजपचे नामोनिशाण मिटले असते, नंदुरबारमधील पराभवाचे नैराश्य इतके की, अक्कलकुवा येथील शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला घडवून जाळपोळ करण्यापर्यंत त्यांच्या भाडोत्री गुंडांची मजल गेली. राष्ट्रवादीतले विजयकुमार गावीत व इतर ‘उपरे’ घेऊन त्यांनी जी उधार-उसनवारी केली त्यामुळे भाजपचे झेंडे लागले. पण कालच्या निवडणुकांतून सत्य बाहेर आले. मुंबईजवळील पालघर जिल्हा परिषदेतून भाजपची सत्ता गेली आहे. शिवसेनेने आधीचाच आकडा 18 हा कायम ठेवला, पण भाजप 21 वरून 12 वर घसरला. राष्ट्रवादी 4 वरून 14 वर गेली. अकोल्यात वंचित आघाडी, तर वाशीमला राष्ट्रवादीस बऱ्या जागा मिळाल्या आहेत. या सर्व जिल्हा परिषदांवर कालपर्यंत भाजपची सत्ता होती, पण राज्यातील सत्ता गमावल्याने जिल्हा परिषदाही रिकाम्या झाल्या,’ अशी जहरी टीका शिवसेनेकडून भाजपवर करण्यात आली आहे.
Visit : bahujannama.com