मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेनेने राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपशी काडीमोड केला. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून राज्यात माहाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. ‘शिवसेनेचा २०१४ मध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव होता’ असे विधान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी करून एकच खळबळ उडवून दिली आहे. आता यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान गांभीर्याने घ्यावे लागणार असून यानिमित्ताने शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला आहे, अशी तोफ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डागली.
याबाबत पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ‘ पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे एक वरिष्ठ व जबाबदार नेते आहेत. त्यांनी शिवसेनेबाबत केलेले विधान आमच्यासाठी आश्चर्यकारक आहेच, शिवाय शिवसेनेचा खरा चेहरा समोर आणणारेही आहे. हे विधान गांभीर्याने घ्यावे लागेल. यातून शिवसेनेसाठी विचारधारा नव्हे तर केवळ सत्ताच सर्वतोपरी असल्याचे स्पष्ट होते. यावर शिवसेनेला स्पष्टीकरण द्यावे लागेल’, असे आव्हानच फडणवीस यांनी दिले.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा नकार
२०१४ मध्ये तसा काही प्रस्ताव दिल्याचे आपल्याला माहिती नसल्याचे शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाण तशा प्रस्तावाबाबत बोलत असतील, तर त्यांनी हा प्रस्ताव देताना उपस्थित असणाऱ्यांची नावे उघड करावीत, असे आवाहन केले. पृथ्वीराज यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसनेही इन्कार केला. शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नव्हता, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.
पृथ्वीराज नक्की काय म्हणाले ?
२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपचे अल्पमतातले सरकार विराजमान झाले होते. शिवसेना तेव्हा विरोधी बाकांवर बसली होती. तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून माझ्याकडे आघाडीचा प्रस्ताव आला होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी स्थापन करू व भाजपला सत्तेतून दूर करू, असा हा प्रस्ताव होता. मात्र, हा प्रस्ताव मी लगेचच फेटाळून लावला होता. जय – पराजय होतच असतात. काँग्रेसच्या पदरी पराभव आला असला तरी या पराभवाने काही डोंगर कोसळलेला नाही. याआधीही असे पराभव झालेत व विरोधी पक्षात आम्ही बसलोत, असे परखड मत नोंदवत तेव्हा मी आघाडीचा प्रस्ताव फेटाळला होता, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.