मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा होती. लोकसभेतील शिवसेनेच्या भूमिकेचा राज्यातील सत्तेवर परिणाम होईल असे बोलले जात आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. या विषयाचा परिणाम महाराष्ट्राच्या सरकारवर होणार नाही. शिवसेना कधीही दबावतंत्राला घाबरलं नाही, हे सरकार धार्मिक अधिष्ठानावर नव्हे तर किमान समान कार्यक्रम यावर चाललं आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, लहान पक्षांना आमिष दाखवून दडपशाहीचा वापर करुन विधेयक मंजूर करुन घेतलं. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला राष्ट्रवाद शिकविला जातो, हिंदुत्व शिकविलं जातं. आम्हाला हिंदुत्व, राष्ट्रवाद कोणाकडून उसणं घेण्याची गरज नाही, हिंदूत्व स्वीकारणं किंवा हिंदू असणं भाजपाची गुलामी स्वीकारणं हे होत नाही, ज्याला सेक्युलर जगायचं आहे त्यांनी कॉग्रेसची गुलामी स्वीकारणं असं होतं नाही असं त्यांनी सांगितले.
नागरिकत्व विधेयकावर बोलताना संजय राऊतांनी टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, शिवसेनेने भूमिका बदलली नाही, जे प्रश्न लोकसभेत विचारले होते तेच प्रश्न राज्यसभेत विचारले. आमच्या प्रश्नाला उत्तरे दिली नाही. हिंदू शरणार्थींना आश्रय देऊ नका असे आम्ही कधीच म्हणलो नाही. आजूबाजूच्या देशात अल्पसंख्यांक म्हणून हिंदूंवर अत्याचार होता आहेत, हे सत्य आहे. या लोकांना नागरिकत्व देण्यास अडचण नाही, परंतु किती प्रमाणात देणार ? या लोकांना कोणत्या राज्यात ठेवणार ?
ईशान्येकडील राज्यात उद्रेक सुरु आहेत ते कशासाठी सुरु आहे ? श्रीलंकेत तामिळ बांधव आहेत तेसुद्धा याच यातना भोगतायेत. जे येतील त्यांना २५ वर्ष मतांचा अधिकार देऊ नका हे आम्ही सांगितले. त्यांनी आश्रय मागितला तर मताचा अधिकार नाही. बेरोजगारी, महागाई, आर्थिक व्यवस्था कोलमडली यावरुन लक्ष हटविण्यासाठी हे सुरु आहे. ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केलं जातयं अशी शंका संजय राऊत यांनी उपस्थित केली.
मी बोलत असताना माईकचा आवाज बंद केला. ही दडपशाही आहे, संसदीय लोकशाही आणीबाणी आणण्याचा प्रयत्न कराल तसं होणार नाही. सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे असल्याने विधेयक पास होणार होतं असं सांगत राऊतांनी भाजपावर पुन्हा आरोप केला.