बहुजननामा ऑनलाईन – सध्या राज्यात घडणाऱ्या घडामोडींवरून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. अशात आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर भाष्य केलं आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोठ्या विकेट या लूज बॉलवरच जातात हे त्यांनी लक्षात ठेवावं असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. राजकारणात कुणावरही इतका विश्वास टाकायचा नसतो असंही ते म्हणाले आहेत. दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केलं.
‘लूज बॉलवरच मोठी विकेट जाते’
फडवीसांवर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी लूज बॉलवर फटकेबाजी जरूर करावी. परंतु मोठ्या विकेट या लूज बॉलवरच जातात हे त्यांनी लक्षात ठेवावं असा चिमटाही त्यांनी काढला आहे. महाराष्ट्रात फक्त चंद्रशेखर भागवत हे एकटेच गुगली टाकायचे. बाकी गुगली गोलंदाज हे डुप्लिकेट आहेत अशी टीकाही राऊत यांनी केली.
‘राजकारणात किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर इतका विश्वास कधीच ठेवायचा नसतो’
पुढं बोलताना संजय राऊत म्हणाले, एकदा हात पोळूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर इतका विश्वास कसा ठेवला याचं आश्चर्य वाटतं. राजकारणात किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर इतका विश्वास कधीच ठेवायचा नसतो. खाद्यांवर विश्वासानं ठेवलेली मान हे अधिकारी कधीही बगलेत दाबू शकतात. हे आताच्या उदाहरणावरून दिसून आलं आहे. अत्यंत सहज सत्तेत जाऊन बसलेल्या लोकांनी या सगळ्या अनुभवानंतर तरी शहाणपण शिकावं असा सल्लाही राऊत यांनी दिला.