मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर राज्यात निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा तिढा कायम दिसत आहे. एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची जवळीक वाढत आहे. दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेतील कोंडी कायम असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर या परिस्थितीने निर्णायक वळण घेतल्याचे दिसत आहे. अशातच शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहत राज्यातला सत्तेचा पेच सोडवण्यासाठी साकडं घातलं आहे.
किशोर तिवारी हे आधी भाजपच्या जवळ होते. नितीन गडकरींचे ते समर्थक मानले जातात. त्यांनी मोहन भागवतांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, जनतेने भाजप आणि शिवसेनेला बहुमत दिलं आहे. त्यामुळे आता तुम्हीच पुढाकार घेऊन हा पेच सोडवा. भाजप युतीधर्माचं पालन करत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. निवडणुकीच्या आधी पदांचं समसमान वाटप केलं जाईल असं ठरलेलं असतानाही भाजप तो शब्द पाळत नाही. जे ठरलं आहे त्याचं पालन व्हायला पाहिजे. भाजपने शब्द फिरवल्याने आता पेच निर्माण झाला आहे. वडिलकीच्या नात्याने आता तुम्हीच दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे कान धरा असंही तिवारी यांनी पत्रात म्हटलं आहे. किशोरी तिवारी यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आता तिवारी यांचं पत्र चर्चेत आलं आहे.
राज्यात सरकार स्थापनेसाठीचा पेच कायम आहे. भाजप-सेनेतील कोंडी कायम आहे. अशात आता ही कोंडी फोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. आज दिल्लीत मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी दिल्लीत होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह इतर नेत्यांच्या भेटी घेतल्या.