मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजप -शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत एकत्र निवडणूक लढविली होती. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद वाढल्याने २५ वर्षांपासूनची युती अखेर तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. यामुळे भाजपला मोठा फटका बसला. राज्यात सर्वात जास्त जागा जिंकूनही सत्ता स्थापन न झाल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता शिवसेनेला एक-वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायला हवं होतं, अशी कुजबूत सध्या भाजपमध्ये सुरू झाली आहे.
सत्ता स्थापनेच्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ५० -५० फॉर्मुल्यावर अडून बसले होते. मात्र, आम्ही असा शब्दच दिला नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती. वास्तविक, सत्तेचे वाटप ५०- ५० असं म्हटल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ देखील उपलब्ध आहे. तरी देखील भाजपने हा दावा खोटा ठरवत विरोधात बाकड्यावर बसने पसंत केले. मात्र यामुळे पक्षांतर्गत नाराजी सुरु आहे.
मागील पाच वर्षात भाजपने केंद्राबरोबरच राज्यातही आपलं ठाणं मजबूत केलं होत. तळागाळात भाजप पोहचविण्यास मदत झाली आहे. मात्र आता सत्ता गेल्यामुळे तयार झालेले संघटन मोडकळीस निघाले आहे. त्यामुळे, शिवसेनेला एक-दोन वर्षे मुख्यमंत्रीपद दिले असते तर काय बिघडले असते, अशी चर्चा नेते करत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना, महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन व्हायला हवे होते. जनतेने तसा कौल दिला होता. आम्ही दोन पावले मागे गेलो असतो, नक्कीच मार्ग निघाला असता अशी खंत व्यक्त केली आहे. यासर्व घटनांमुळे भाजप नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
Visit : bahujannama.com