मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याच्या अनेक भागात पूरस्थिती आहे. असे असताना आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री कसे होणार, हे सांगण्यात शिवसेना गुंतली आहे. अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गेले होते. त्यावेळी ते बोलत होते.
मी पुरस्थितीवर तीन दिवसांपासून लक्ष ठेवून आहे. आम्हीही पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या स्थितीत राज्य सरकार तातडीने मदत करण्यात अपयशी ठरले आहे. सरकारला याचे गांभीर्य नाही. सरकारने गांभीर्याने कुठेही लक्ष दिलेले नाही. अख्खा शिवसेना पक्ष आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री कसे होणार हे सांगण्यात गुंतला आहे. सात ते आठ दिवस लोक पाण्यात आहेत. पाण्याचा फुगवटा वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने चुकीचे जीआर काढले आहेत. ते बदलायला हवेत. जेणेकरून लोकांना मदत मिळू शकले. असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणूकीत वंचितने सर्व जागा स्वतंत्र लढविल्या होत्या. त्यामुळे कॉंग्रसेच्या १० जागा धोक्यात आल्याचे मतदानाच्या आकडेवरून दिसते. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचा आऱोप कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला होता. त्यावर विधानसभा निवडणूकीत आमच्यासोबत आघाडी करायची असेल तर कॉंग्रेसने बी टीमच्या आरोपाचा खुलासा करावा असे आवाहन त्यांनी केला.