बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी झालेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत बोलताना केला.(Shiv Sena and BJP )त्यावर जर तुमच्या १०० पिढ्या आल्या तरी शिवसेनेचा भगवा उतरवणे सोडाच, पण त्याला हातही लावता येणार नाही, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला. त्यानंतर आता पुन्हा शिवसेना आणि भाजपात भगव्यावरून तू-तू मैं-मैं सुरू झाले आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना संजय यांनी म्हटलं की, मुंबई महापालिकेवर फडकणारा भगवा अस्मितेचा आहे. हा भगवा राजकारणाचा नाही, छत्रपतींच्या तेजातून निर्माण झालेला भगवा आहे. भगवा तुमचा अन् आमचा वेगळा नाही, छत्रपतींचा भगवा, मराठी अस्मितेचा भगवा आहे; मग तुमचा भगवा कोणता? तुम्हाला भगवा फडकवायचा असेल तर बेळगाव महापालिकेवर फडकवावा, काश्मीरवर फडकवावा, बलुचिस्तानवर फडकवावा राजकारणात टीका-टिप्पणी होत असतात, आमचे हिंदुत्व हे जनतेला माहिती आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
शिवसेनेच्या भगव्यात भेसळ झाली आहे, चीनच्या मदतीने काश्मिरात कलम ३७० पुन्हा लागू करू, वीर सावरकरांचा घाणेरड्या शब्दांत अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे भगव्याचा अपमान करत आहेत, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना काढला. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना-भाजप यांच्यातील वाद कोणत्या शिगेला जाऊन पोहाेचतो हे पाहणं आता औत्युक्याचे ठरणार आहे.
… तर त्यांच्या भगव्या झेंड्याचे शुद्धीकरण गरजेचे
शिवसेनेने हिंदुत्व सोडले असून, त्यांच्या भगव्या झेंड्याच्या शुद्धीकरणाची वेळ आली आहे. त्यांची मनोधारणाच गोऱ्या लोकांच्या कामासारखी झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकांना त्यांनी तिलांजली दिली आहे, अशा शब्दांत भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे