नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा उत्साहात पार पडत असून दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमात खासदार छत्रपती संभाजीराजे हे शिवजयंतीनिमित्त काहीना काही कार्यक्रम ठेवत असतात. यावेळीही त्यांनी कार्यक्रम ठेवला असून मात्र कार्यक्रमादरम्यान गोंधळ उडाला आहे. या कार्यक्रमानिमित्त शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटचे जवान सकाळपासून बंदच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना मानवंदना करत होते. पण दुपारी जेवणाच्यावेळी हे जवान कॅंटीनमध्ये गेले होते. तेव्हा सहाय्यक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी या जवानांना जेवणाच्या ताटावरून हाकलल्यामुळे गोंधळ उडाला.
एका वृत्तसंस्थेनुसार हे जवान पहाटे ६ वाजल्यापासून महाराष्ट्र सदनात उपस्थित असून गोरखा रेजिमेंटचे जवान कोणत्याही कार्यक्रमाला जात नाहीत. पण ते पहिल्यांदाच महाराष्ट्र सदनात आले होते. त्यांना कॅंटीनमध्ये जेवण वाढून ठेवल्यामुळे तेथे बोलावले होते. दरम्यान तुम्हाला इथे जेवता येणार नाही. तुमची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी केली, असे महाराष्ट्र प्रशासनाचे अधिकारी विजय कायरकर यांनी सांगितले आणि त्यांना बाहेर काढले. त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला.
नंतर काही आयोजकांनी झालेल्या प्रकाराला शांत करण्याचे काम केले. जवानांचा सन्मान योग्य पद्धतीने व्हायला हवा. मात्र त्यांना धक्काबुक्की केली गेली. तसेच अधिकाऱ्यांकडून धमकीची भाषा वापरण्यात आली. या प्रकारावर कारवाई व्हावी आणि हा प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीत अजिबात रुचणारा नाही, असे शिवभक्तांचे म्हणणे आहे. या अशा प्रकारामुळे शिवभक्त नाराज झाले असून या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शिवभक्त करत आहेत.