अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन- राज्यभरात शेतकरी संघटनेच्यावतीने सरकारने संपूर्ण शेतीमालला नियमनमुक्त करावे. आणि मार्केट सेझ कायमचा रद्द करावा या मागणीसाठी २५ फेब्रुवारीपासून राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.
या मागणीसाठी गेल्या ४० वर्षांपासून शेतकरी संघटना कृषी उत्पन्न बाजार समित्यांना विरोध करत आहेत. मार्केट कमिटीत गेलेल्या शेतीमालाचा दर ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्याला राहत नाही. त्याचा लिलाव होतो. दर पसंद नसला तरी माल परत घरी घेऊन जाणे परवडत नाही. म्हणून, शेतकरी नाईलाजाने आपला माल विकतो. बाजार समितीबाहेर माल खरेदी विक्री करण्यास परवानगी असल्यास शेतकऱ्याच्या घरी किंवा शेतावर सौदे होतील व भाव पटला तरच व्यवहार होतील. नाहीतर होणार नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले.
राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात संपूर्ण नियमनमुक्तीचा प्रस्ताव मांडला होता. पण व्यापारी व हमाल मापाड्यांचा विरोध झाल्यामुळे विधेयक मागे घ्यावे लागले होते. दुरुस्त विधेयकात दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम. खरेदीदाराने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचा नियम रद्द करण्यात यावा. तसेच मार्केट सेझही रद्द करण्यात यावा, अशी मागणी व्यापारी व शेतकरी संघटनेने केली होती.