नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि सीएए आणि एनआरसीविरूद्धच्या अलीगड मुस्लीम विद्यापीठातील आंदोलनात प्रक्षोभक भाषण करणारा शर्जील इमाम याच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे. तपास यंत्रणांनी शार्जीलच्या केलेल्या चौकशीतून आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शर्जील हा कट्टरतावादी विचारसरणीकडे झुकलेला असून भारत इस्लामी राष्ट्र व्हावे असे त्याला वाटते, अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे.
शार्जील इमामने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अलीगड मुस्लिम विद्यापीठात प्रक्षोभक भाषण केले होते. आपल्या भाषणात त्याने आसामला भारतापासून तोडण्याचे वक्तव्य केले होते. यावरून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याचा शोध पोलीस घेत होते. त्याच्या मुळ गावी जाऊन पोलिसांनी त्याच्या भावाला सुद्धा ताब्यात घेतले होते. नंतर शार्जीलला बिहारच्या जेहानाबादमधून अटक करण्यात आली. सध्या तो दिल्ली पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलीस त्याची चौकशी करत असून या चौकशीतून अनेक प्रकारची धक्कादायक माहिती मिळाल्याचा दावा केला जात आहे.
चौकशीत शार्जीलने सांगितले की, अलीगड मुस्लीम विद्यापीठातील भाषणाचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ माझ्याच भाषणाचा आहे. त्यात कुठलीही छेडछाड केलेली नाही. मात्र, ते भाषण अपूर्ण आहे. मी तासभर बोललो. बोलण्याच्या ओघात आसाम देशापासून तोडण्याबाबत बोलून गेलो. अटकेचा मला कुठलाही पश्चात्ताप नाही, असे त्याने पोलिसांना म्हटले आहे. शर्जीलने आसाम तोडण्याचे वक्तव्य खूप विचारपूर्वक केले आहे, असा पोलिसांच्या गुन्हे शाखेला संशय आहे.
Visit : bahujannama.com