सातारा : बहुजननामा ऑनलाईन – पवार साहेब मोठे नेते आहेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या वक्तव्याचा फायदा आपल्या देशाला होतो की, पाकिस्तानला होतो. मतांसाठी असं वक्तव्य करणं ही गोष्ट योग्य नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांनी केलेल्या पाकिस्तानबाबतच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘मतांसाठी अशी विधानं करणं योग्य नाही’ : मुख्यमंत्री
पवारांच्या पाकिस्तानबाबतच्या वक्तव्यामुळे त्यांचा समाचार घेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पवार साहेब मोठे नेते आहेत. त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, त्यांच्या वक्तव्याचा फायदा आपल्या देशाला होतो की, पाकिस्तानला होतो. राहुल गांधी जम्मू काश्मीरला गेले आणि काही अशा प्रकारची वक्तव्यं केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात म्हटलं की, बघा राहुल गांधीही असंच बोलत आहेत. निवडणुका येतील जातील पण मतांसाठी अशा प्रकारची वक्तव्ये करणं योग्य नाही. पवारांना कदाचित माहिती नसेल की, भारतातील मुसलमानाला देशाचा नितांत अभिमान आहे. त्यांच्यासमोर पाकिस्तानची स्तुती केली तर ते मतं देतील हा विचारच अन्यायकारक आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची मानसिकता दिसून येते.” असे ते म्हणाले.
काय म्हणाले होते पवार ?
अल्पसंख्याक मेळाव्यात बोलताना शरद पवार म्हणाले होते की, “पाकिस्तान आणि भारतात वेगळी फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तान म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण बनवलं जात आहे. पाकिस्तानात एवढी वाईट परिस्थिती नाही. काही लोक स्वत:च्या फायद्यासाठी वातावरण दूषित करत आहेत. बीसीसीआयचा अध्यक्ष असताना मी पाकिस्तानात गेलो आहे. तेव्हा एक वेगळं वातावरण पाहिलं आहे. एक वेगळी स्थिती आज देशासमोर आली आहे.”