कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधासभेसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत आणि एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्यात कोणीही मागे नाही त्यातच रिपाइं नेते आणि सामाजिक न्यायराज्यमंत्री यांनी शरद पवारांना चक्क NDA सोबत येण्याचा सल्ला दिला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधील मंत्र्याचा शपथविधी पार पडला त्यात रिपाइं नेते आठवलेंनीही शपथ घेतली, केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रामदास आठवले यांनी पहिल्यांदाच कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राहुल गांधी, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर आपल्या खास शैलीत टीका केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी उलट-सुलट बोलून मते घालवली आहेत. त्यामुळे त्यांना आता तोंड दाखवायला देखील जागा राहिली नाही. तसेच वंचित आघाडीवर टीका करताना त्यांनी म्हंटले कि,प्रकाश आंबेडकरांनीही वंचितांना सत्तेत आणायचे असल्यास एनडीएमध्ये यावे. प्रकाश आंबेडकर हे वंचितांना सत्तेपासून दूर ठेवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
काँग्रेसची दोनही निवडणुकीतील परिस्थिती पाहता काँग्रेस देशात लवकर सत्तेत येईल असे वाटत नाही, त्यामुळे देश हितासाठी पवारांनी मोदींना साथ द्यावी, असे आठवले यावेळी म्हणाले. राम मंदिराचा विषय पुढे आणत असताना मात्र त्यासाठी मुस्लीमांवर दबाव टाकता कामा नये. शिवाय ते मंदिर अधिकृत असावे, असे राम मंदिराच्या मुद्द्यावर आठवले म्हणाले. येणाऱ्या विधानसभेला आठवले गटाला १२ जागा मिळाव्यात तसेच छोट्या मित्र पक्षांना विधानसभेच्या २० जागा हव्या आहेत. अशी मागणी आठवलेंनी केली.