तुळजापूर : बहुजननामा ऑनलाईन – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा शेट्टी यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडला. शेट्टी यांनी सहकार्यांसमवेत तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले आणि महाराष्ट्रातील शेतकर्यांचा सातबारा कोरा करून शेतकर्याला संकटातून मुक्त करण्याचे साकडे घातले. या मेळाव्यात बोलतांना राजु शेट्टी म्हणाले की, काबाडकष्ट करणार्या शेतकर्यांना मदतीसाठी सरकारकडे पैसा नाही, मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, कर्जमाफीबद्दल शरद पवारांची भाषा आता बदलली आहे, अशी टीका शरद पवारांवर त्यांनी केली. त्या वेळी राजु शेट्टी म्हणाले की, शरद पवार यांनी शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी दिलेले आश्वासन पाळण्याऐवजी नैसर्गिक आपत्तीच्या काळात सरकारवर अवलंबून राहू नये, असे नवे विधान केले.
यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी नाराज होऊन सातबारा कोरा कधी होणार याच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, नाबार्डच्या निधीतून शेतकऱ्यांना बँकेमार्फत दिलेले कर्ज फेडण्यासाठी प्रतिवर्षी ३० जून ही तारीख असते. प्रत्येक शेतकरी आपले कर्ज वेळेत फेडून बँकेतील आपले क्रेडिट खराब होऊ देत नाही. याचा गैरफायदा सरकार घेत आहे. धनदांडगे शेतकरी अथवा व्यापार करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका बोलावून घेऊन कर्ज देतात आणि आपले टार्गेट पूर्ण करतात, अशा बँकांना सामान्य शेतकऱ्यांना कर्ज देण्याची सक्ती सरकारने केली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
त्यानंतर ते पुढे म्हणाले की, गरजू शेतकर्यांना बँका दारामध्ये उभे राहू देत नाहीत ही वस्तुस्थिती असून शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सातबारा कोरा झाल्याशिवाय स्वस्थ बसू देणार नाही, हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा आहे अशा शब्दांत त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. शरद पवार यांच्या विधानाकडे लक्ष वेधून त्यांनी दोन्ही सरकारकडून शेतकर्याला धुडकावले जात आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकर्यांच्या पाठीशी उभी आहे, असेही त्यांनी सांगितले.