Sharad Pawar On Santosh Deshmukh Murder Case | मस्साजोग हत्या प्रकरणावरून शरद पवार संतापले; म्हणाले – ‘मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळायला हव्यात’

बीड: Sharad Pawar On Santosh Deshmukh Murder Case | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे विधानसभेसह लोकसभेतही पडसाद उमटले. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड (Valmik Karad) यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप केला जात आहे. त्यामुळे धनंजय मुडेंवर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे.
दरम्यान आज शरद पवार यांनी मस्साजोग गावात दाखल होत कुटुंबियांशी, ग्रामस्थांशी संवाद साधला व संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हंटले. तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शिक्षा होईपर्यंत आमचे शिलेदार स्वस्थ बसणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले, ” बीड जिल्ह्यात जे काही घडले ते कोणालाही न पटणारे आणि सहन न होणारे आहे. ज्या तरुण सरपंचाची हत्या झाली आहे त्यांनी गेली १५ वर्षे इथल्या लोकांसाठी भरपूर काम केले आहे. त्यांनी लोकसेवेचे काम केल्यामुळेच लोकांनी १५ वर्षे त्यांची निवड केली. तो तरुण सरपंच येथील लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाशी समरूप होणारा होता. वादविवादापासून दूर राहणारा होता. असा हा तरुण कर्तबगार लोकप्रतिनिधी तुमच्या गावात काम करत होता.
परंतु, येथील कोणाला तरी दमदाटी झाली आणि त्या प्रकरणी चौकशी करत असताना चौकशी करण्याची भूमिका का घेतली म्हणून बाहेरून कोणीतरी येतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो. हा हल्ला शेवटी त्यांच्या हत्येपर्यंत जातो हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. राज्य सरकारला व केंद्र सरकारला याची नोंद घ्यावीच लागेल.
ते पुढे म्हणाले, ” लोकसभेचे अधिवेशन नुकतेच संपले आहे. तुमचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे, खासदार निलेश लंके यांनी हा विषय लोकसभेत मांडला आणि न्यायाची मागणी केली. बजरंग सोनावणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकसभेत केलेली भाषणे मी ऐकली. ते पाहून या देशात, या राज्यात काय चाललंय असा प्रश्न देशभरातील प्रसारमाध्यमे विचारू लागले आहेत.
तुमचं दुःख जिथे मांडायला हवं तिथे तुमच्या लोकप्रतिनिधींनी मांडले आहे. आता सरकारने याच्या खोलात जायला हवे. याचा मुख्य सूत्रधार कोण आहे त्याच्या मुसक्या आवळायला हव्यात. हल्लेखोर व त्याचा कोणाशी संवाद चालू होता ही सगळी माहिती बाहेर काढली पाहिजे. वस्तूस्थिती समोर आणली पाहिजे”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
Comments are closed.