मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन आहेत असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी शरद पवार आजही आहेत असंही ते म्हणाले. पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन आहेत. वयाची 75 वर्ष उलटूनही ते ज्या उत्साहाने काम करत आहेत त्याची सगळ्याच तरुणाईला भुरळ पडली आहे. 35 वर्षांपासून शरद पवार यांच्यावर टीका केली जात आहे. आधी बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे हे शरद पवारांवर टीका करत असत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे त्यांच्यावर टीका करत आहेत. याचा अर्थ हा आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आजही शरद पवार आहेत.”
मोदींवर टीका करताना आव्हाड म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानची साखर चालते. कांदा चालतो. नवाज शरीफला दिलेली अचानक भेट, बिर्याणी सगळं चालतं. फक्त इथे येऊन पाकिस्तानवर टीका करायची. निवडणूक महाराष्ट्राची आहे तर मोदी शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, बंद झालेले एक लाखापेक्षा जास्त कारखाने या सगळ्या विषयांवर का बोलत नाहीत ?” असा सवाल आव्हाड यांनी केला. इतकेच नाही तर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी महापूर आला त्याचा साधा उल्लेखही मोदींच्या भाषणात नव्हता. निवडणूक जिंकणे हा एकच भाजपचा उद्देश आहे असं दिसतंय.”
भाजप-शिवसेनेवरील एका प्रश्नावर आव्हाड म्हणाले, “शिवसेनेला 100 जागा दिल्या तरी ते युती करतील, अन्यथा पक्ष फुटेल अशी भीती त्यांना आहे.” अजित पवार शरद पवारांइतके चर्चेत नाहीत असा प्रश्न विचारला असता मिश्कील उत्तर देत आव्हाड म्हणाले, “शरद पवार आमचे अमिताभ बच्चन आहेत. मात्र आमचा पक्ष म्हणजे मल्टिस्टारर सिनेमा नाही.”
Visit : bahujannama.com