मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी घेतलेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey Interview with Sanjay Raut) यांची परखड मुलाखत वाचकांच्या भेटीला आली आहे. तत्पूर्वी या मुलाखतीचे प्रोमो खासदार राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवरुन पोस्ट केले होते. सामना वर्तमानपत्रात या मुलाखतीचे तिन्ही भाग प्रसारीत केले आहेत. त्यात मुख्यमंत्र्यांनी भाजपाला अनेक मुद्यांवर इशारा देत चांगलाच दम भरला आहे. तसेच राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी जनता हेच या सरकारचा केंद्रबिंदू असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. शेती उद्योगासह राजकारणावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केल्याचे दिसून येत आहे.
महाविकास आघाडीचे भवितव्य चांगले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांना लवकरच दिल्लीत जाऊन भेटणार आहे. तर, शरद पवार हे सरकारचे मार्दर्शक आहेत, रिमोट कंट्रोल (sharad-pawar-guide-government-not-remote-control) नाहीत, असा खुलासाही उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या तिसऱ्या भागात केल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी मुलाखतीच्या याच तिस-या भागात सीएए कायद्याचे समर्थन केले आहे. मात्र एनआरसीचा फटका देशातील हिंदूंना बसेल, आदिवीसी नागरिकांनी कुठून आपले नागरिकत्व सिद्ध करावे, कुठून त्यांनी दाखले आणावेत? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. कोणतेही सरकार घटनेनुसारच चालते. मोदी घटनाबाह्य सरकार चालवत आहेत काय? अन्न, वस्त्र, निवारा हेच आमचे संविधान, असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुलाखतीत खा. राऊतांनी या सरकारला बाप किती? असा प्रश्न मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, बाप हा एकच असतो आणि आईही एकच असते, असे म्हणत रिमोट कंट्रोल वगैरे काही नाही. आम्ही तीन वेगळे पक्ष आहोत. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे, आणि हो तुम्हाला शरद पवारांविषयी विचारयचे आहे का. तर, शरद पवार हेही रिमोट कंट्रोल म्हणून वागत नाहीत. त्यांच्या काही सूचना असतील, तर त्या जरुर करतात. त्यांचा अनुभव दांडगा आहे, त्यांच्या अनुभवाने ते मला नक्कीच मार्गदर्शन करतात. मला एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी मीही त्यांचे मार्गदर्शन घेतो. पण, त्यांचीही एक खास गोष्ट आहे, त्यांना एखादी गोष्ट समजावून सांगितल्यानंतर तेही म्हणतात, ठीक आहे… तुमचे म्हणण बरोबर आहे., असे अनुभव सांगत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना मार्गदर्शक मंडळात स्थान दिले आहे.
शेतकरी, कष्टकरी हाच केंद्रबिंदू
शेतकरी आणि कष्टकरी हेच विकासाचे केंद्रबिंदू राहतील. हे आपल सरकार त्यांच्या हितासाठीच राबवले जाईल, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील एकही उद्योग आता राज्याच्या बाहेर जाणार नाही, रोजगाराच्या संधी वाढतील. एमआयडीसींची अवस्था चांगली नाही, त्यात सुधारणा होईल हा शब्द उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून दिला. तसेच, नाईट लाईफ म्हणजे फक्त मौजमजा छंद फंद नाहीत, श्रमणाऱ्या मुंबईची ती गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.
मुंबईतील काही पुनर्विकासाचे प्रकल्प रखडले आहेत. त्यात बरीच गुंतागुंत आहे. ती गुंतागुंत सोडवावी लागेल आणि त्याच्यात गुंतवणूक आणावी लागेल ्से म्हणत या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले आहे. सरकार 5 वर्षे पूर्ण करणारच सामनाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संजय राऊत यांनी अकरा दिवसांत सरकार पडणार असे भाकित अनेकांनी केली होती, यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर, उत्तर देताना तस बोलणाऱ्यांचे दात पडत आलेत, आता हे सरकार नक्कीच 5 वर्षे पूर्ण करणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच, सामनाच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील जनतेला साष्टांग नमस्कार घालतो, सर्वांच्या सहकार्यामुळेच, एकजुटीमुळेच हे शक्य झाले आहे. ‘
मी संयमी आहे, पण याचा अर्थ नामर्द नाही
ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत, ही पद्धत निदान महाराष्ट्राची नाही. मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी नामर्द नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला इशारा दिला आहे.
तर तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढूः मुख्यमंत्री
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला, त्यावेळी त्यांच्या मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे ठणकावले आहेत. तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात, तेव्हा अशी वेसण घालावीच लागेल. ईडी काय, सीबीआय काय, त्यावर राज्याचा अधिकार नाही? असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे. आम्ही देतो ना नाव, आमच्याकडे आहेत नाव. मालमसाला तयार आहे, पूर्ण तयार आहे. पण सुडाने जायच का?. मग जनतेन आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची सुडानेच वागायच असेल तर तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढू, असा दमच उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना भरला आहे.
दरम्यान, संजय राऊतांनी पोस्ट केलेल्या दुसऱ्या प्रोमोमध्ये राऊत यांनी राज्यात वाढीव वीजबिलावरून सुरु असलेल्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला आहे. यावर उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे मुलाखतीत पाहण महत्त्वाचे ठरणार आहे. मागील काही दिवसापासून राज्यात वीजबिलावरून रणकंदन माजल आहे. भाजपाने वीजबिल होळी आंदोलन केले तर राज ठाकरेंच्या मनसेने वीजबिलाच्या मुद्द्यावर राज्यभरात प्रचंड मोठे मोर्चे काढले त्यामुळे वीजिबिलाच्या या घटनेवर उद्धव ठाकरे काय सांगतात आणि भाजपा-मनसेवर काय भाष्य करतात याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.