बीड : बहुजननामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी बीड येथील कार्यकर्ता मेळाव्यात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या ५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पवारांनी विधानभेसाठी तरुण चेहऱ्यांना संधी देत यात बीडमध्ये संदीप क्षीरसागर, गेवराई-विजयसिंह पंडित, केज-नमिता मुंदडा तर परळी-धनंजय मुंडे, माजलगावमधून-माजी मंत्री प्रकाश सोळंके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या वेळी पवारांनी बीडमधील पक्षांतर केलेल्यांवरदेखील सडकून टीका केली आहे.
‘ज्यांना आम्ही एक वेळा नाही ते अनेक वेळा मंत्री पदाची संधी दिली, ते जयदत्त क्षीरसागर पक्ष सोडून गेले. कारण विचारले तर सांगतात म्हणे विकास करायचाय. पंधरा वर्षे मंत्री होते तेव्हा विकास केला नाही का?’ असा टोला पवारांनी क्षीरसागर यांना लगावला. तसेच महाराष्ट्रात वेगळंचित्र दिसते. तरुणाई तसेच शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे. सत्तेत आल्यानंतर सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाही. बँकेचे कर्ज फेडता आले नाही. म्हणून आत्महत्या करत आहे. राज्यांत १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
भाजप सरकाने कर्ज माफी केली ती पण ऑनलाईन केली, परंतु प्रत्यक्षात त्याचा फायदा फक्त ४० टक्केच लोकांना मिळला, ६० टक्के शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज अजूनही तसेच आहे. तरुणांना नोकरी नाही, बेरोजगारांची संख्या वाढली, त्यासाठी राज्य सरकारने ठोस पाऊले उचलली नाहीत. महाराष्ट्रात बेरोजगारांची भयानक परिस्थिती आहे. आमच्याकडे सत्ता असताना कारखाने आणून रोजगार निर्माण केला. तसेच देशात सर्वात जास्त मुंबई कापड तयार करणारे शहर म्हणून ओळख होती. आज मुंबईत १२० गिरण्या पैकी ११४ गिरण्या बंद आहेत. यामुळे तब्बल दीडलाख लोकांचे रोजगार गेले. फक्त १४ हजार लोक काम करतात. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. मुंबईत औषधाला मराठी माणूस पाहायला मिळत नाही, असे पवार म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत काम केलेले नाही, मग त्यांना मत मागण्याचा काय अधिकार आहे? ज्या ठिकाणी मुख्यंमत्री राहतात त्या नागपूर शहरात सगळ्यात जास्त गुन्हेगारी आहे. नागपूरची आज ‘क्राईम सिटी’ म्हणून ओळख आहे, त्यामुळे त्यांना परत द्यायचे नाही, असा घणाघात त्यांनी केला.
Visit : Bahujannama.com