नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील शाहीनबाग येथे सुमारे दिड महिन्यापासून सीएए आणि आएनआरसीविरूद्ध महिलांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात घुसून एका युवकाने जय श्रीरामच्या घोषणा देत गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने त्याचे नाव कपिल गुर्जर असे सांगितले असून या कृत्याबाबत त्याने पोलिसांना दिलेली माहिती धक्कादायक अशी आहे. या देशात केवळ हिंदूच चांगले काम करतील, असे त्याने पोलीस चौकशीत सांगितले आहे.
शाहीन बागमधील धरणे आंदोलनात गोळीबार करणारा युवक 25 वर्षांचा असून त्याचे नाव कपिल गुर्जर आहे. तो महाविद्यालयात शिकत आहे. कपिल गुर्जरने याच परिसरातून रिक्षा केली आणि तो शाहीन बागमध्ये गेला. तिथे त्याने पिस्तुलने 2 गोळ्या झाडल्या. काही मुठभर लोकांनी आपल्याच देशातील शाहीन बागेत आंदोलन सुरू करू न बाग हस्तगत केल्याच्या रागातून त्याने हा गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळी असलेल्या काही लोकांनी सांगितले की, पोलिसांजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीने जय श्रीरामच्या घोषणा देत दोन किंवा तीन वेळा गोळीबार केला. आम्ही अचानक आलेला बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आणि घोषणांचा आवाज ऐकला. त्याच्याकडे सेमी ऑटोमेटिक बंदूक होती. या बंदुकीतून त्याने दोन गोळ्या झाडल्या. पोलीस त्याच्या मागे उभे होते. त्याची बंदूक जाम झाल्यानंतर तो पळून जाऊ लागला. यावेळीही त्याने पुन्हा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर त्याने त्याच्याकडील बंदूक झाडीत टाकली. यानंतर काही पोलिसांच्या आम्ही त्याला मदतीने पकडले.
दोन-तीन दिवसांपूर्वीच जामीया विद्यापीठातील विद्यार्थी सीएए, एनआरसीविरूद्ध आंदोलन करत असताना एका माथेफिरूने त्यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडालेली असताना पुन्हा शाहीन बागमध्ये सुद्धा गोळीबाराची अशीच घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, जामियामध्ये गोळीबार करणार्या आरोपीचा सत्कार करण्याची घोषणा हिंदू महासभेने केली आहे.