मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – वसई विरार महापालिकेच्या नालासोपारा येथील आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी गेलेल्या एका ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हरीशभाई पांचाळ (वय, ६३) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्या व्यक्तीला उन्हामुळे चक्कर आल्याने खाली पडले असल्याने मृत्यू झाला आहे. अशी माहिती पालिका डॉक्टरांनी दिली. परंतु या केंद्रात अँब्युलन्स आणि प्राथमिक उपचाराची सुविधा नाही यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला.
याबाबत अधिक माहिती अशी, हरीशभाई पांचाळ हे नालासोपारा पश्चिमेच्या पाटणकर परिसरात राहत होते. आज सकाळी १० च्या दरम्यान ते तेथील महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रात लसीकरणासाठी गेले होते. ते नाव नोंदणी करण्यासाठी रांगेत उभे राहिले असता अचानक त्यांना चक्कर आली आणि खाली कोसळले. त्यांना जवळच्या पालिका हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याबाबत तेथील नागरिकांनी अशी माहिती दिली की, लसीकरण केंद्रात अँब्युलन्स उपलब्ध नव्हती. जी अँब्युलन्स होती ती केवळ डॉक्टरांना ने आण करण्यासाठी होती, त्यात ऑक्सिजनची कोणतही सुविधा नव्हती. त्यामुळे अँब्युलन्स चालकाने रुग्णाला नेण्यास नकार दिला. या ठिकाणी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते निमेश वसा यांनी मध्यस्थी करून अँब्युलन्समधून हरीशभाई पांचाळ यांना नेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र पांचाळ यांचा हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी मृत्यू झाला. तसेच तेथील सामाजिक कार्यकर्ते निमेश वसा यांनी लसीकरण केंद्रावर कोणत्याही सुविधा नसल्याचा आरोप सुद्धा केला आहे. या ठिकाणी किमान प्राथमिक सुविधा असत्या तर पांचाळ यांचा जीव वाचला असता, असे ते म्हणाले. मात्र पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी सांगितले, या रुग्णाला आधीच मधुमेहाचा त्रास होता, तर सर्व आरोग्य केंद्रावर रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन सुविधा उपलब्ध आहेत. लस घेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे, असं त्या म्हणाल्या.