बहुजननामा ऑनलाइन – सुरक्षित शहरासाठी “सीसीटीव्ही”चे जाळे अधिक मजबूत केले जाणार असून, पूर्ण शहरात उच्च क्षमतेचे १ हजार ५०० सीसीटीव्ही बसवले जातील व ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येतील. पुणेकरांची सुरक्षा हेच पुणे पोलिसांचे पहिले प्राधान्य असेल असे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. पुणे पोलीस आयुक्तालयात आज वार्तालाप झाला. यावेळी ते बोलत होते.
गुप्ता म्हणाले, पुणेकरांना बाहेर पडल्यानंतर सुरक्षित वाटले पाहिजे. त्यासाठी नवीन योजना कार्यान्वित केल्या जाणार आहेत. शहरात प्रमुख चौक व रस्त्यांवर सीसीटीव्ही बसवलेले आहेत. पण, शहराचा विस्तार पहाता आणखी त्यात वाढ करून सीसीटीव्हींची संख्या १ हजार ५०० पर्यंत नेली जाईल. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था भक्कम होण्यास मदत होईल. यापुर्वी लावलेले काही नादुरुस्त कॅमेऱ्यांची दुरुस्ती केली जाईल. तसेच सीसीटीव्ही क्षमता काळानुरूप बदलत चालली आहे. त्यापाश्र्वभूमीवर शहरातील सर्वच सीसीटीव्ही अपग्रेड करण्यावर भर दिला जाणार आहे. नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भात आठ दिवसात प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे.
पोलिस ठाण्याच्या हद्दीची पुनर्रचना
शहराची लोक संख्या वाढत आहे. तसा विस्तार देखील वाढत आहे. त्यामुळे वाढती लोक संख्या आणि विस्तार यामुळे येत्या काळात पोलिस ठाण्यांच्या हद्दीची पुनर्रचना करावी लागेल. त्यासाठी यापूर्वी रचना केलेल्या उपायुक्त (झोन) कार्यालयांना राज्य सरकारची मान्यता घ्यावी लागेल. त्याचा प्रस्ताव तयार करून पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे. त्यांच्या मान्यतेनंतर नव्याने सर्वेक्षण करून पोलिस ठाण्यांसह झोन तयार केले जाणार आहेत. विशेषत: हडपसर, चतु:शृंगी पोलीस ठाण्याची पुर्नरचना करण्यावर भर दिला जाईल.
वाहतूकोंडीवर उपाय “आयटीएमएस”चा
शहरात वाहतूक कोंडी सर्वात महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे. त्यासाठी इंटेलियन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’चा वापर प्रभावीपणे केला जाणार आहे. त्यानुसार शहरातील वाहतूकीवर काम केले जाणार असून, आम्ही पुढील २५ ते ३० वर्षांच्या वाहतुकीचा विचार करून नियोजन करणार आहोत. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक निर्णय घ्यावे लागणार आहे. त्यासाठी पुरेसे अधिकारी, कर्मचारी देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.