बहुजननामा ऑनलाईन टीम : चहाच्या मळ्यात काम करणार्या कामगारांचे तब्बल अडीच लाख खाते एसबीआय बँकेमध्ये अकार्यरत होते. ही माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कळाली. त्यानंतर त्यांनी एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांना धारेवर धरत, तुम्ही किती वेळात ती सारी खाती पुन्हा कार्यरत करणार आहात ? त्यावर रजनीश कुमार यांनी रिझर्व्ह बँकेकडून परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी एक आठवडा जाईल. असे सांगताच अर्थमंत्र्याचा पारा वाढला. त्यांनी बँक चेअरमनला तुम्ही निर्दयी, अकार्यक्षम आहात अशा शब्दात सुनावले.
देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या वरिष्ठांवर अर्थमंत्री सीतारामन प्रचंड संतापल्याचा प्रकार घडला आहे. तुम्ही अकार्यक्षम आहात. असा संताप व्यक्त करीत त्यांनी एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांना दिल्लीत भेटायला बोलाविले आहे. गुवाहटी येथे 27 फेब्रुवारी रोजी स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी आणि वित्तीय सेवा विभागाच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन बोलत होत्या. सीतारामन यांनी माझी दिशाभूल करू नका.
या प्रकरणी आता तुम्ही मला दिल्लीत भेटा. मी हा विषय सोडणार नाही. ही पूर्णपणे कामचोरी आहे. याबद्दल मी तुम्हाला जबाबदार धरतेय. या विषयावर आता मी तुमच्याशी सविस्तर चर्चा करेन. चहाच्या मळ्यात काम करणार्या कामगारांची खाती सुरू करा. तुमच्या हेकेखोरपणाचा त्या गरिबांना फटका बसायला नको. असे म्हणत त्यांनी बँक अध्यक्षांना धारेवर धरले. दरम्यान, सीतारामन यांच्या या वक्तव्याचा ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन (एआयबीओसी) असोसिएशनने निषेध केला आहे.