नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – गांधी हत्येच्या खटल्यात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर विरोधात कसलाच पुरावा नसल्यामुळे त्यांची निर्दोष सुटका झाली. असे असूनही डाव्या विचारांची मंडळी सावरकर हे गांधी हत्येच्या कटात सहभागी होते असे भासवून त्यांची बदनामी करीत आहेत. त्यामागे त्यांचे हेतू पुर्णत: राजकीय आहेत, असे प्रतिपादन इंतिहासाचे अभ्यासक प्रा. विवेक जाधवर यांनी येथे केले.
गाधीहत्या : सावरकरांची बदनामी कशासाठी या विषयावर आयोजित साहित्य संमेलन व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब पांडे, प्रा. देवदत्त तुंगार, प्रा. शारदा तुंगार, शंतनु डोईफोडे, वसंत मैय्या, मोहनराव पाटील-सुगावकर, डॉ. श्रीनिवास पांडे आदिउपस्थित होते. गांधी हत्येच्या कटात सावरकरांचा कसा हात होता हे भासविण्याची पद्धतशीर मोहीम १९९० च्या दशकामध्ये सुरु झाली. या काळात भाजपाची लोकप्रियता वाढत होती. या दोन्हीचा कसा सहसंबंध आहे ते प्रा. जाधवर यांनी सांगितले. त्यामुळे बहुतेक वेळा सावरकरांची बदनामी करण्यामागे भाजपवर टीका करणे हा हेतू असतो, असे त्यांनी सांगितले. सावरकरांच्या बदनामीला त्यांच्या काही अनुयांयानी देखील हातभार लावला आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोपाळ गोडसे यांचे ‘गांधीहत्या आणि मी’ हे पुस्तक होय. त्यात लेखकाने गांधी हत्येसंदर्भातील सावरकरांच्या भुमिकेबाबत संदिग्धता निर्माण केल्यामुळे सावरकरांची बदनामी झाली असे त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले.
आपल्या व्याख्यानात ‘प्रा. जाधवर यांनी गांधीहत्या खटल्यातील विशेष न्यायालयाचा निकाल, त्यासंदर्भात झालेले साक्षी-पुरावे आणि १९६० च्या दशकात नेमलेल्या न्या. कपूर आयोगाच्या अहवाल व त्यासमोर झालेल्या जबान्या या सर्वांचा तपशीलाने आढावा घेतला. कटातील एक आरोपी दिगंबर बडगे हा नंतर माफीचा साक्षीदार बनला. त्याला पोलीसांनी विविध आमिषे दाखवून साक्ष वदवून घेतली. सावकरांचा सहभाग होता हे सिद्ध करण्यासाठी सरकारपक्षाकडे बडगेच्या साक्षीशिवाय दुसरा कोणताही पुरावा नव्हता. ही साक्षदेखील विशेष न्यायालयाने ग्राह्य धरली नाही. याच कारणास्तव सावरकरांची खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. इतकेच नव्हे तर सरकारने याच्या विरोधात पुर्व पंजाब उच्च न्यायालयात अपीलही केले नाही असे प्रा. जाधवर यांनी स्पष्ट केले.
या सगळ्या दस्तऐवजांचा सोईस्कर वापर करुन डावी मंडळी सावरकरांचा कटातील सहभाग सिद्ध करु पाहत आहेत आणि त्यांची बदनामी करीत आहे. या मोहिमेत तीस्ता सेटलवाड, प्रफुल्ल बिडवई, ए.जी नुरागी यांच्यासारखे पत्रकार आणि कायदेपंडीत आघाडीवर आहेत अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रातील बुद्धिजीवी वर्गातील अनेकांनी सावरकरांकडे नेहमीच संशयाने पाहिले आहे. महाराष्ट्रातील डॉ. य. दि. फडके, डॉ. रावसाहेब कसबे आदी आघाडीच्या विचारवंतांनी सावरकरांच्या विचारांची विपर्यस्त मांडणी केली. त्यामुळे सावरकरांचे विचार हे ज्ञानव्यवहारातून आणि संशोधनाच्या क्षेत्रातून हद्दपार झाले. यामुळे महात्मा गांधींनतर गांधीवादाचा जसा विकास झाला तसा सावरकरवादाचा होऊ शकला नाही, अशी खंत प्रा. जाधवर यांनी व्यक्त केली. डॉ. बालाजी चिरडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. विश्वाधार देशमुख यांनी सुत्रसंचलन केले. डॉ. दुर्गेश रवंदे यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. डॉ. विजय भोसले यांनी आभार मानले.