बहुजननामा ऑनलाइन टीम – जावळी तालुक्यातील रानगेघर येथे गुरुवारी सायंकाळच्या वेळेस डोंगरातून शेळ्या परत येताना त्यावेळी बिबट्याने शेळ्यांवर(Leopard attacks goats) हल्ला केला. या हल्ल्यात ८ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या असून ४ जखमी अवस्थेत आहेत. या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
रानगेघर परीसरातील डोंगरात अनेक दिवसापासून बिबट्या आढळून आला होता. अनेक शेळ्या डोंगरात चरायला सोडल्या होत्या. शेळ्या माघारी येत असताना सायंकाळच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या कळपावर हल्ला केला. वनविभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वीही या परिसरातील विकास जांभळे यांच्या दोन शेळ्यां बिबट्याने वस्तीतून पळवल्या होत्या. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने याकडे लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
रानगेघर परिसरात जंगलाचे प्रमाण वाढल्यामुळे याठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. डोंगराच्या शेजारील वस्तीवर अधूनमधून बिबट्याचा हल्ला होत असून यामध्ये शेळ्यांचा बळी जात आहे. यात शेतकऱ्यांला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. शासन व वनविभागाने याकडे लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी व होणाऱ्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्यावी. असे रानगेघरच्या सरपंचानी सांगितले.