बहुजननामा ऑनलाइन टीम – सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार देणे सातारा जिल्ह्यातील वाई येथील महिलेला चांगलेच महागात पडले आहे.( report of gang-rape) तपासात ज्यावेळी हा बनव असल्याचे लक्षात आले तेव्हा पोलिसांनी ‘ब’ नावाने समरी वाई न्यायालयात दाखल केली. न्यायालयात तक्रार खोटी असल्याचे सिद्ध होताच त्या महिलेविरुद्ध खटला दाखल करण्याचे न्यायालयाने पोलिसाना आदेश दिले आहे. दरम्यान, न्यायालयाने पोलिसांना आदेश दिल्यामुळे वाईमध्ये एकच खळबळ उडाली आहे. खोटी तक्रार देऊन दोन जणांना बलात्काराच्या गुन्हा अडकवण्याचा प्रयत्न महिलेच्याच अंगलट आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नोकरीला लावतो असे आमिष दाखवत वाई ते महाबळेश्वरच्या दरम्यान वारंवार गाडीमध्ये दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने २७ जुलै २०१९ रोजी वाई पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार, वाई पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या तपासामध्ये पोलिसांना असे निष्पन्न झाले की, या दोघांपैकी एक आरोपी गुन्हा घडल्याच्या दिवशी परदेशात होता तर दुसरा आरोपी पुण्यात असल्याचे समोर आले.
ज्या चारचाकी गाडीमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा घडला असे सांगण्यात आले होते. ती कार गुन्हा घडण्याच्या आगोदर नांदेडमध्ये असल्याची माहिती पोलिसांना तपासात समोर आले. महिलेने दिलेली तक्रार आणि तपासात समोर आलेल्या सर्व बाबीमध्ये तफावत असल्याने पोलिसांनी या प्रकरणात ‘ब’ नावाने समरी वाई कोर्टात दाखल केली. त्यानुसार, महिलेने दिलेली तक्रार चुकीची आणि द्वेषापोटी केली असल्याचे कोर्टात सिद्ध झाल्याने वाई कोर्टाने बलात्काराची खोटी तक्रार दाखल करणाऱ्या महिलेविरुद्ध खटला दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.