नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात अनेक प्रकरणावरून खळबळ उडाली आहे. यावरूनच आता राजकारण अधिकच तापलं असतानाच आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये एक नवा वाद निर्माण होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युपीएच्या नेतृत्वासंदर्भात युपीएचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देणे आवश्यक असल्याचे विधान केल्याने यावरून काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
युपीएच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस आणि शिवसेना मध्ये कलगीतुरा चर्चा रंगली आहे. तसेच सोनिया गांधी या युपीएच्या अध्यक्ष असून त्यांना बदलवण्याचा कुठलाही विचार नाही. त्यामुळे युपीएचे अध्यक्ष बदलण्याबाबत जे बोलत आहेत, त्यांनी प्रथम युपीएचा घटक पक्ष म्हणून सामील व्हावं, तसेच ‘युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत आणि त्याच अध्यक्षा राहतील. तर महाराष्ट्रात सध्या काही कळीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष राज्यात समजूतदारपणाने प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करत आहे. बाहेरच्या मंडळींनी युपीएमध्ये प्रवेश घेतला की त्यांच्या मतांची योग्य ती दखल घेऊ, असे काँग्रेस नेते राजीव सातव यांनी ट्विट करत म्हटले आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
शरद पवार यांच्या सारख्या राजकारणातील ज्येष्ठ नेत्याला संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) अध्यक्ष बनवण्याची आवश्यकता आहे, असं मत व्यक्त करत, काँग्रेसमधील अनेक नेते हे शरद पवार यांच्या नावाला पसंती देतात. आतापर्यंत सोनिया गांधी या युपीएच्या अध्यक्ष होत्या. परंतु सध्या त्यांच्या प्रकृतीमुळे त्या युपीएसाठी फार वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी शरद पवार सर्वात योग्य आहेत, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर परमबीर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यानच्या काळात भाजपसोबत लढण्यासाठी तिसरी आघाडी बनवण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. काँग्रेस आणि भाजप विरहित इतर राजकीय पक्षांची एक तिसरी आघाडी बनवण्याची आवश्यकता आहे, असं मत स्वतः शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. तर सध्या काँग्रेस पक्षातील काही नेत्यांचा G.23 हा एक राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक गट बनला आहे. यातील एक नेता तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये सध्या नाराजीचं वातावरण दिसत आहे.