मुंबई :बहुजननामा ऑनलाइन – Sanjay Raut |पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला आहे. राणे यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. नारायण राणे यांची राजकीय उंची पाहता त्यांना तितकं महत्त्वाचं खातं मिळालं नाही. पण तरीही त्यांनी देशाचा आणि राज्याच्या विकासासाठी काम करावे ही अपेक्षा, असं मत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मंत्रीपदापेक्षा राणेंची उंची मोठी
संजय राऊत म्हणाले, नारायण राणे यांना मंत्री केलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय दिलं आहे. नारायण राणे यांची उंची त्यापेक्षा मोठी आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेक पदं त्यांनी सांभाळली आहेत, असं राऊत म्हणाले. तसेच नारायण राणे यांच्यासमोर महाराष्ट्र आणि देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचं आणि कोरोना काळात कोलमडलेल्या उद्योगांना संजीवनी देण्याचं मोठं आव्हान असल्याचे राऊत यांनी म्हटले.
राणेंमुळे शिवसेनेला फटका बसेल ?
शिवसेनेला (Shivsena) फटका बसावा म्हणून राणेंना मंत्रिपद दिलं असेल तर तो कॅबिनेट मंत्रिपदाचा अपमान ठरेल. केंद्रीय मंत्र्यांनी देशासाठी काम करायचं असतं. शिवसेनेला फटका देण्यासाठी त्यांना संधी दिली असेल तर हे घटनाविरोधी आहे. असं होत असेल तर ते चुकीचं आहे. मंत्रिपद हे राज्याचा किंवा देशाचा कारभार करण्यासाठी असतं. एखाद्या पक्षाविरोधात लढावं म्हणून एखाद्या व्यक्तीला मंत्रिपद दिलं गेलं तर मंत्रिपदाची प्रतिष्ठा राहणार नाही, असा शब्दात संजय राऊत यांनी रोखठोक मत व्यक्त केलं.
जावडेकरांसारखा अनुभवी मोहरा पडला
संजय राऊत पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचे पत्ते पिसले असून महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रिपद आली आहेत. परंतु प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्यासारखा अनुभवी आणि ज्येष्ठ मोहरा पडलेला आहे, असे राऊत म्हणाले.
मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा शिवसेना राष्ट्रवादीचा
भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे (NCP) आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून जो पुरवठा
झाला आहे त्यामुळेच महाराष्ट्रातून मंत्रीमंडळात चेहरे मिळाले आहेत. कपील पाटील (Kapil Patil)
हे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट आहे. भारती पवार (Bharti Pawar) या पूर्णपणे राष्ट्रवादीचं प्रोडक्शन आहे.
नारायण राणे हे शिवसेना, काँग्रेस करत भाजपमध्ये गेले आहेत. मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा शिवसेना
राष्ट्रवादीचाच आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.