पुणे : बहुजननामा ऑनलाईन – छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले होते. बहुजनांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी सरकारची तिजोरी रिकामी केली होती. आर्थिकदृष्ट्या गरीब दीन दलित व बहुजनांचे कैवारी म्हणून शाहू महाराजांची ओळख होती. बहुजनांच्या मुलांची शैक्षणिक कुवत वाढावी व सर्वांना शिक्षण सक्तीचं आणि मोफत मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्यातील सर्व मंदिरांचा पैसा मुलांच्या शिक्षणासाठी वापरावा. हीच आजच्या काळाची गरज आहे. असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॕड. पुरूषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.
संभाजी ब्रिगेड पुणेच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या १४५ व्या जयंतीच्या निमित्ताने आरटीओ शेजारील एसएसपीएमएस येथील शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, आजची तरुण पिढी उद्याचं भविष्य असल्यामुळे मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. म्हणून शाहू महाराजांनी शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व दिलं. सक्तीच्या शिक्षणाबरोबर मराठा व बहुजनांच्या मुलांना आरक्षण लागू केलं, मराठा धर्माची स्थापना केली. अंधश्रद्धा व कर्मकांडावर प्रहार करताना त्यांनी वेदोक्त प्रकरणावर आपली परखड भूमिका मांडली. अशा थोर महापुरुषांची जयंती महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन दिवाळी सारखी साजरी केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने राज्यात KG to PG हे शिक्षण सक्तीचे व मोफत करून सर्वांसाठी खुले करावे अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे.
तर संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले, राज्यातील सर्व शाळा म्हणजे सध्याची ‘दुकानदारी’ करणारी माध्यमे झालेली आहेत. आणि जि. प. च्या सरकारी शाळा व मराठी शाळा उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. म्हणून राज्य सरकारने प्राथमिक शिक्षणासह सर्व शिक्षणाचा दर्जा वाढवावा. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे. यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. ‘प्राथमिक शिक्षणापासून ते पदवी पर्यंतचे सर्व शिक्षण मोफत देण्याचा निर्णय सरकारने याच अधिवेशनात घ्यावा. अन्यथा सरकारने शाहू महाराजांची जयंती साजरी करू नये. कारण तरूण मुले आत्महत्या करत आहेत. सरकारला तो नैतिक अधिकार नाही. सरकारचे धोरण पाहता. शाहू महाराजांच्या शैक्षणिक व आरक्षणाच्या विरोधात हे सरकार काम करत असून गरीबाचे शिक्षण महाग करत चाललेलं आहे. फडणवीस सरकारने सर्व मंदिरांवर तात्काळ प्रशासक नेमून मंदिरावरील सर्व पैसा गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व बहुजनांच्या गुणवंत मुलांवर खर्च करावा…’ मुलांना शिष्यवृत्ती द्यावी हीच ‘संभाजी ब्रिगेड’ची मागणी आहे. अन्यथा सरकार ला या विधानसभेमध्ये निवडणुकीत पापाचे धनी व्हावे लागेल.
कारण ९४ टक्के गुण असलेला मुलगा (देवळाली ता. कळंब जिल्हा उस्मानाबाद) आत्महत्या करतो हेच या सरकारचे पापी शैक्षणिक धोरण आहे. सध्याची शिक्षणव्यवस्था ‘तमाशा’ होऊन बसलेली असल्यामुळे शैक्षणिक व्यवस्था बकाल अवस्थेत आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचा वैचारिक महाराष्ट्र राहिलेला नाही. असेही ते म्हणाले.
यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॕड. पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, प्रवक्ते गंगाधर बनबरे, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, मराठा सेवा संघाच्या शहर कार्याध्यक्ष स्नेहल ताई धाडवे पाटील, पुणे जिल्हा सचिव महादेव मातेरे, महेंद्र जाधव, सिद्धार्थ कोंढरपूरकर, संजय चव्हाण, ज्योतिबा नरवाडे, केदार नाकाडे आदी उपस्थित होते.