मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – शरद पवार हे पुरोगामी असले तरी त्यांचा पक्ष प्रतिगामी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष संभाजी भिडे चालवतात असा घणाघाती आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आगमी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित राज्य दौरा सुरु असतांना अहमदनगरमधील शिर्डी येथे त्यांनी हा आरोप केला.
आगमी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जिल्हादौरा सुरु केला आहे. दरम्यान भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील राज्याचा दौरा सुरु केला आहे. दरम्यान अहमदनगरमधील शिर्डी येथे माध्यमांशी बोलतांना, काँग्रेसकडून आम्हाला १२ जागा हव्या आहेत. जर, काँग्रेसने १२ जागा दिल्या तर आम्ही महाआघाडीसोबत जाऊ, अन्यथा महाराष्ट्रातील सर्वच म्हणजेच ४८ जागांवर उमेदवार उभे करू अशी निवडणुकांबद्दल भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. मात्र शरद पवार हे पुरोगामी असले तरी त्यांचा पक्ष प्रतिगामी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष संभाजी भिडे चालवतात. आणि आघाडी झाली तरी आम्ही केवळ काँग्रेसचा प्रचार करू. राष्ट्रवादीचा प्रचार आम्ही करणार नाहीत. त्यांचा प्रचार काँग्रेस करेल. असेही ते म्हंटले.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यात आघाडी बाबत बैठक झाली दरम्यान आंबेडकरांसोबत आघाडी संदर्भात झालेली चर्चा सकारात्मक असल्याचे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हंटले होते. आणि आज प्रकाश आंबेडकरांचे राष्ट्रवादी काँग्रेस बद्दलचे हे वक्तव्य. यावरून आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी होणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.