पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे तसेच समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी अद्याप दोघांविरोधात दोषारोपपत्र दाखल केलेले नाही. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार अल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याबाबत योग्य तो तपास करून रीतसर करावाई करण्यात येणार असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले. तसेच माजी न्यायमूर्ती व एल्गार परिषदेचे आयोजक असलेल्या बी.जी. कोळसे पाटलांची सुरक्षा का काढली याविषयीची माहिती घेत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. गृहमंत्र्यांनी शुक्रवारी येरवडा कारागृहाला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
अनिल देशमुख म्हणाले, कारागृहातील कैदी कुशल कारागीर आहेत. विविध वस्तू ते तयार करतात. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी विक्रीदालन सुरु करण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे. पाश्चात्य देशांप्रमाणे आधुनिक कारागृह बांधण्याचा तसेच राज्यातील पोलिसांना निवासस्थाने देण्यासंबंधीचा प्रस्ताव विचारधीन असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.