सोलापूर बहुजननामा : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे हे पुन्हा एकदा आपल्या अनोख्या तर्कामुळे गोत्यात आले आहेत. संभाजी भिडे म्हणाले कि, ‘ आतापर्यंत अमेरिकेने ३८ वेळा आपला उपग्रह चंद्रावर सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र अमेरिका आपल्या त्या प्रयत्नात अयशस्वी ठरले. त्यावेळी नासाच्या वैज्ञानिकाने भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास करून उपग्रह सोडलाआणि तो यशस्वी झाला. अमेरिकेने एकादशी दिवशी उपग्रह सोडला म्हणूनच तो यशस्वी झाला,’ असं विधान त्यांनी केलं.
शिवप्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर दुर्गामाता दौड होणार आहे. त्यासाठी सोलापुरात येथे आयोजित केलेल्या बैठकीत संभाजी भिडे बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा एकादशी आणि अमेरिकेचा अनोखा संबंध जोडला आहे. संभाजी भिडे यांच्या म्हणण्यानुसार, ‘भारतीय कालमापन पद्धतीला जगात कुठेच तोड नसून एक सेकंदांचा हजारावा भाग मोजण्याची पद्धतदेखील भारतीय कालपमापन पद्धतीमध्ये आहे. अमेरिकेने याच कालमापन पद्धतीचा वापर केला आणि त्यांना त्यांचा उपग्रह चंद्रावर सोडण्याच्या प्रयोगात यश प्राप्त झालं. ‘
काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांनी आपल्या वक्तव्यामुळे वाद ओढवून घेतला होता. ज्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातुन टीका केली जात होती. संभाजी भिडे म्हणाले होते कि, ‘विशिष्ट आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते. ज्यावर ऑस्ट्रेलियात संशोधन झालं आहे. त्यात या आंब्यात ती शक्ती असल्याचं सिद्ध झालं आहे. भारतात देखील अनेकांनी यावर सशोधन केलं असून त्यातही ती गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यामुळे हे योग्य पद्धतीने समजून घ्यायला हवं ‘ या वक्तव्यानंतर भिडेंवर राज्यभरातून चौफेर टीका झाली होती.
‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे आणि राज्यघटनाही आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून लिहिली,’ असा भिडेंनी सांगितले होते . परंतु त्यांचं हे वक्तव्य निराधार असल्याचे सिद्ध झालं होत. त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या एका धक्कादायक वक्तव्यामुळे त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. ते म्हणाले होते कि, ‘खेड्यापाड्यातूनही संघटनात्मक बांधणी करून कितीतरी अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनू हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांपेक्षाही श्रेष्ठ होता.’