मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात चाललेल्या अनेक घडामोडीवरून राजकारणात खळबळ उडाली आहे. तर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक नवा दावा केला आहे. जेव्हा सचिन वाझेंना पुन्हा पोलीस सेवेत घेतलं होतं, तेव्हाच काही वरीष्ठ नेत्यांशी बोलताना मी म्हणालो होतो की त्यांच्यामुळे पुढे अडचणी निर्माण होतील, असं राऊत यांनी म्हटले आहे. यावरून आता केलेले भाष्य आणि त्यांनी चर्चा केलेले नेते नेमके कोण? अशा नव्या चर्चेला उधाण लागलं आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
जेव्हा सचिन वाझेंना पुन्हा पोलीस दलात घेतलं, तेव्हा मी काही वरीष्ठ आणि प्रमुख नेत्यांशी बोलताना म्हटलं होत, या अधिकाऱ्याचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत बघता हा आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकेल. आणि मी हे बोललो हे ते नेतेही सांगतील. कोणताही अधिकारी वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवते. ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलं, त्यावर कदाचित कुणाचं नियंत्रण राहिलं नसेल. यातून अनेक मंत्र्यांनाही धडा मिळाला असेल, तर राऊत यांनी काही वरीष्ठ नेत्यांशी बोलल्याचेही भाष्य केले आहे.
राऊत म्हणाले, आपण राजकारणात असू, तर टीका सकारात्मकपणे घेतली पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंवर आयुष्यभर टीका झाली आहे. शरद पवारांवर अजूनही होते. उद्धव ठाकरे टिकेचे घाव सोसूनच या शिखरावर पोहोचले आहेत. त्यामुळे गृहमंत्री देशमुख यांच्याबद्दल मी ४ शब्द लिहिले असतील, तर त्याचा अर्थ तुम्ही असा घेऊ नये की आमचं काही भांडण आहे म्हणून. हा काही मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार अजिबात नाही, तसेच देशमुख हे सदगृहस्थ आहेत. अनेक वर्ष राजकारणात आहेत. गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर पहिल्यांदाच जबाबदारी पडली आहे. तीन पक्षांचं सरकार चालवताना कदाचित त्यांना काही अडचणी आल्या असतील. या सर्व घडामोडींमधून त्यांना खूप गोष्टी शिकता आल्या असतील. नेता असाच घडतो आणि मंत्री असाच घडतो. यातून त्यांना पुढे जाण्यासाठी एक चांगली दिशा मिळणार आहे. अशी संजय राऊत यांनी गृहमंत्री देशमुखांची पाठराखण केलीय.