बहुजननामा ऑनलाईन – अंबानीच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी NIA ने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना अटक केली आहे. दरम्यान वाझे यांच्या नियुक्तीवरून समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. वाझेच्या नियुक्तीला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. वाझेंची नियुक्ती होणार असल्याचे कळल्यानंतर मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांना वाझेंना पोलीस दलात घेऊ नका, अशी विनंती केली होती, असा गौप्यस्फोट आझमी यांनी केला आहे.
आझमी यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वाझेंना पोलीस दलात घेतले जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर मी शरद पवार, संजय राऊत आणि देशमुखांना भेटलो होतो. पण परमबीर सिंह यांनी या दोघांना असा काय सल्ला दिला की त्यांना पोलीस दलात घेतले गेले, असा सवाल आझमी यांनी उपस्थित केला आहे. ख्वाजा युनुस हत्या प्रकरण सुरू असताना वाझेंना पोलीस दलात घेणे ही ठाकरे सरकारची मोठी चूक होती. तसेच मी सत्तेत असूनही सांगतो की, ज्या दिवशी वाझेंचा विषय विरोधकांनी हातात घेतला, त्याच दिवशी त्यांना निलंबित करणे गरजेचे होते. पण वाझेंना निलंबित केल नाही ही सरकारची दुरी मोठी चूक होती, असे आझमीनी म्हटले आहे. वाझे यांचे कॅरेक्टर पहिल्यापासून वाईट आहे. त्याला सिंह दोषी आहेत. पैसे वसुली प्रकरणात सिंह यांनाच जबाबदार धरल पाहिजे. गृहमंत्री देशमुखांनी जर अधिकाऱ्यांना पैसे वसुलीचं टार्गेट दिले होते. तर सिंह यांनी पवार आणि मुख्यमंत्र्यांना का सांगितलं नाही. सिंह यांनीच पैसे वसुली केली आहे. त्यांच्याविरोधात पैसे वसुलीच्या अनेक केसेस सुरु असल्याचा दावाही आझमी यांनी केला आहे.