कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात दोघा संशयित फरार आरोपींची खात्रीशीर माहिती देणाऱ्यास सीआयडीने बक्षीस रक्कमेत तब्बल पाचपट वाढ केली आहे. सनातन संस्थेचे साधक विनय बाबुराव पवार व सारंग दिलीप अकोळकर यांचा पानसरे हत्येत सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याबाबत माहिती देणाऱ्यास यापूर्वी १० लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होते. परंतु आता सीआयडीने रक्कम ५० लाख रुपये केली असल्याची माहिती मंगळवारी गृह विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. यासंबधी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
कॉ. पानसरे हत्येचा तपास संथगतीने होत असल्याने उच्च न्यायालयाने ‘एसआयटी’वर ताशेरे ओढले होते. गृहखात्यावरही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर फरारी घोषित पवार, अकोळकरच्या शोधासाठी गृहखात्याने एसआयटीला व्यापक शोधमोहिमेचे आदेश दिले आहेत. ‘एसआयटी’ने डॉ. वीरेंद्र तावडे, समीर गायकवाड, शार्पशूटर भरत कुरणेसह आठ मारेकर्यांना अटक केली. मात्र, मास्टरमाईंड विनय पवार, सारंग अकोळकर तपास पथकाला चकवा देत अद्यापही पसार आहेत.
एसआयटी तपास पथकातील अधिकार्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. सहायक तपासाधिकारी तथा अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे यांना सहायक म्हणून पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, तत्कालीन पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांच्यासह दोन पोलिस निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक, एक पोलिस उपनिरीक्षक व २५ कॉन्स्टेबलचे बळ पुरविण्यात आले आहे. कॉ. पानसरे हत्येप्रकरणी गुरुवार, २८ मार्च रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. एसआयटीमार्फत तपासाचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.