मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना लसीकरणास राज्यात मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. मात्र, त्या मानाने लसीचा पुरवठा होत नाही. राज्यात केवळ एक दोन दिवस पुरेल एवढाचा लसीचा साठा शिल्लक आहे. मात्र, महाराष्ट्रात लसीकरण तसेच बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांत हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप केंद्रीय आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. त्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. दरम्यान, राज्यातील भाजप आणि महाविकास आघाडीतही या मुदद्यावरून धुसमूस सुरु झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांच्यासह काही भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेण्यापेक्षा केंद्राशी समन्वय साधून लस मिळवण्यासाठी प्रयत्न करावे असा सल्ला दिला होता. त्यामुळे वातावरण चांगलेल तापले होते. आता राष्ट्रवादीनेही याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टव्दारे लसीकरण मोहिमेवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. सरकार पाडण्यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहे तेवढे राज्याच्या हितासाठी करावे असा टोला त्यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेश आणि राज्याला मिळालेल्या लसीची तुलना केली. मूळातच लस वितरण लोकसंख्येच्या आधारावर होत नाही. पण तरीही हे लोक उत्तर प्रदेशबरोबर महाराष्ट्राची तुलना करतायेत. केंद्रसरकारच्या गृहितकानुसार वेस्ट रेट हा १० टक्के असू शकतो, पण आपण तो अवघा ३ टक्के ठेवला. एकूणच राज्यातील बाधितांची संख्या आणि होणारा लस पुरवठा याचाही विरोधकांनी विचार करायला हवा.
महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग वाढवला आहे. नोंदणी केल्यानंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटात लस देण्यात येत आहे. परंतु, मागणीच्या प्रमाणात लसीचा पुरवठा होत नाही. त्यामुळे लसीकरणामध्ये अडथळे निर्माण होत आहे. सध्या १० लाख डोस शिल्लक असल्याचे समजते. ते परवापर्यंत संपतील. मात्र, आज काही ठिकाणी लस संपल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्याला १.६ कोटी डोस मिळाले असून दोन्ही डोस मिळून ९३.३२ लाख लोकांचं लसीकरण पूर्ण केलं तर ३ लाख डोस वाया गेल्याचे वास्तव असल्याचेही रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांनी लस पुरवठ्यावरून सुरु असलेल्या राजकारणवरही भाष्य केले त्यांनी विरोधकांना काही प्रश्न विचारले असून त्याची उत्तर देण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. यामध्ये सध्या परिस्थीती पाहता लसीकरणाचा अजून किती वेग वाढवायला हवा ? लसीचा पुरवठा वाढवून मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणे म्हणजे राजकारण आहे का? राज्याला तातडीने अधिक लस मिळाव्यात याला विरोध आहे का? या प्रश्नांचा समावेश आहे.
राज्याच्या हितासाठी शर्थीचे प्रयत्न करावेत
कोरोनाचं संकट गडद होताना दिसत आहे. यासंकटातून राज्याला बाहेर काढण्याची वेळ आहे. त्यासाठी विरोधी पक्षाचे नेते नक्कीच हातभार लावली अशी अपेक्षा आहे. सध्या केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आणि कशी मदत केली ही सांगायची वेळ नाही. जनतेला ते योग्य वेळी कळेलच. किमान संकट काळात तरी विरोधकांनी राजकारण करु नये अशी विनंती आहे. सरकार पडावं यासाठी शर्थीतचे प्रयत्न करत आहेत. पण सरकार पडणार नाही. राज्याच्या हितासाठी तेच शर्थीतचे प्रयत्न करावेत असा टोला लगावत संकटकाळी जनतेसोबत, सरकारसोबत उभं रहावं. महाराष्ट्र आपला सदैव ऋणी राहील, असे पवार यांनी म्हटले आहे.