कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – भीमा कोरेगाव येथे झालेल्या हल्ल्यानंतर कोल्हापुरात ३ जानेवारी रोजी जिल्हा बंद ठेवला होता. यावेळी तोडफोड, वादावादीचे प्रसंग घडले. या प्रकरणी आंबेडकरी तरुणांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार हे गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, ३ जानेवारी रोजी आंबेडकरी जनतेने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आंदोलनास कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागातील जनतेने पाठिंबा दिला होता. बंद शांततेत चालू असताना काही समाजकंटकांनी जातीय सलोखा बिघडवण्याचे काम केले. जातीय तणाव निर्माण करून सामंजस्य बिघडवले होते. कोल्हापूर शहर, गांधीनगर, हातकणंगले व करवीर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. काही निरपराध कार्यकर्त्यांवर हद्दपारीची कारवाई केली. आंबेडकरी चळवळीतील शेकडो कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. राज्य सरकारने हे गुन्हे मागे घेण्याचे ठरविले आहे. तशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने हे गुन्हे मागे घ्यावेत. यावेळी प्रा. शहाजी कांबळे, बाळासाहेब भोसले, सतीश माळगे, प्रा. गुंडुराव कांबळे, प्रवीण आजरेकर, रणजित शिवसरन, कैलास कांबळे, शेखर कांबळे, रोहन वाघमारे, दत्ता मिसाळ आदी हजर होते.