नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – प्रशासनिक सेवांचे अन्यन्य साधारण महत्त्व, समाज आणि राष्ट्रासाठी योगदान, परीक्षा पद्धती, विषयांची निवड, यशस्वीतेचे मंत्र आणि समाजातर्फे उपलब्ध असलेल्या सुविधांविषयक सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा प्रशासनिक सेवा मार्गदर्शन समितीतर्फे पुणे येथे मार्गदर्शन शिबीर पार पडले. या शिबिरात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा व राजस्थानमधून अनेक माहेश्वरी सीए, अभियंते, डॉक्टर उपस्थित होते. विशेष म्हणजे शिबीरार्थींपैकी ५० टक्के मुली होत्या.
पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, महेश पूजन, महेश वंदना तसेच पुलवामा शहिदांना श्रध्दांजली अर्पण केल्यानंतर पुणे जिल्हा माहेश्वरी सभा, महिला संगठन व युवा संगठनतर्फे प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. समिती प्रमुख प्रा.किशनप्रसाद दरक यांनी माहेश्वरी युवक प्रशासकीय सेवांमध्ये का येत नाहीत यांची कारणमीमांसा करुन निमंत्रित प्रमुख वक्त्यांना शंकांचे समाधान करण्याचा आग्रह केला. तसेच ए. बी. माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सिवील सर्विसेससाठी दिल्लीत येणाऱ्या माहेश्वरी युवक – युवतींसाठी पटेल नगर दिल्लीत एप्रिलपासून सुरु होणाऱ्या श्री जयचंदलाल करवा हॉस्टेलची तसेच गरजूंसाठी बद्रीलाल सोनी ट्रस्टतर्फे उपलब्ध आर्थिक सहाय्याची माहिती दिली. मार्गदर्शक म्हणून हिमाचलच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त प्रधान सचिव डॉ. श्रीकांत बालदी, अतिरिक्त आयकर आयुक्त संजय पुंगलिया, सुचना व प्रसारण मंत्रालयाचे विशेष अधिकारी संतोष अजमेरा आणि नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रामनारायण गगराणी उपस्थित होते.
माहेश्वरी सभेचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी व समिती प्रमुख प्रा. किशनप्रसाद दरक यांच्या मार्गदर्शनात समिती सदस्य मनोज मालू (पुणे), ओमप्रकाश तापडीया (नांदेड), महेश लाहोटी (पुणे), ओमप्रकाश बजाज (लातूर), प्रदेश कोषाध्यक्ष दिनेश सोमाणी (कल्याण) यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. प्रमुख वक्त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रभावित होऊन अनेक युवक युवतींनी सिविल सर्विसेसमध्ये येण्याचा संकल्प केला, हे या शिबीराचे फलित होय, असे एका प्रसिद्ध पत्रकात कळविण्यात आले आहे. माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ पुणेचे अध्यक्ष अतूल लाहोटी, सुप्रसिध्द उद्योजक हिरालाल मालू, विठ्ठलदास मणियार, डॉ. रामविलास मंत्री, धनराज राठी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सूत्रसंचालन अभय जाजू व मधुसुदन गांधी यांनी केले. राष्ट्रगीतानंतर शिबिराची सांगता झाली.