मुंबई बहुजननामा ऑनलाईन – विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी राज्यभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने पुकारलेल्या संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचाक दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेण्याची शक्यता आहे.
काय आहे याचिकाकर्त्यांचे म्हणणे ?
डॉक्टरांना संप करता येत नाही, असे उच्च न्यायालयाने पुर्वी एका आदेशात म्हटले आहे. मार्डनेदेखील संप करणार नाही अशी हमी दिली होती. तसेच डॉक्टरांचे प्रश्न सोडविण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्तींची समितीही स्थापन करण्यात आलेली आहे. तरीही डॉक्टर संपावर गेल्याने त्यांच्यावर कंटेम्पटची कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली आहे.
यासाठी मार्डने दिला आहे संपावर जाण्याचा इशारा
विद्यावेतनाच्या प्रश्नावर यापूर्वीही निवासी डॉक्टरांनी आंदोलन केले आहे. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. केवळ आश्वासने देण्यात आली आहेत. काही महिन्यांनी विद्यावेतनाचा प्रश्न पुन्हा प्रलंबित राहतो. अकोला, अंबाजोगाई, लातूर, नागपूर या सरकारी वैद्किय महाविद्यालयातील विद्यार्थिनी अनेकदा वेळेवर विद्यावेतन मिळावे याची मागणी केली आहे. तरीही हे प्रश्न प्रलंबित आहेत. तर केंद्र सरकारच्या निवासी डॉक्टरांना मिळते तेवढे विद्यावेतन राज्यातील निवासी डॉक्टरांना मिळावे अशी मागणी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने केले आहे. यासाठी मुंबईतील निवासी डॉक्टरांनी आज संपावर जाण्याचा इशारा दिला होता.