सांगली : बहुजननामा ऑनलाईन – सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असताना सरकारी नोकर्या मात्र कमी होत आहेत. त्यामुळे यापुढे सरकारी नोकरीचा विचार डोक्यातून काढून टाका. उद्योगाची सुरूवात करून नोकरी मिळवणारे नाही नोकरी देणारे व्हा ,असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे केले. महापालिका आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात विविध कंपन्या, उद्योजक, व्यापारी सहभागी झाले होते. निवड झालेल्या तरुणांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानातंर्गत महापालिकेतर्फे हा उपक्रम राबवला. ना. पाटील यांच्या हस्ते महिला बचत गटांना आणि वैयक्तिक लाभार्थ्याना कर्ज देणार्या बँकाचा सन्मान करण्यात आला. चारस्तरीय संघांना प्रत्येकी 50 हजार रुपयांप्रमाणे दोन लाखाचे धनादेश देण्यात आले. महापालिका क्षेत्रातील महिला बचत गटांना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे 26 बचत गटांना 2लाख 60हजार रुपयाचे धनादेश देण्यात आले.
ना. पाटील म्हणाले, शहरांचा विकास होत आहे. महापालिकेसाठीच्या शंभर कोटीच्या विकास कामाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. राज्यातील 12 कोटी शेतकर्यांना 6 हजार प्रमाणे 72 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. पंचवीस ते पन्नास टक्के शेतमाल सरकार हमीभावाने विकत घेणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना आता चांगले पैसे मिळतील. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग सुरू करावेत. नवीन कामगार कायद्यामुळे तडकाफडकी नोकरीवरून काढता येणार नाही. बचतीसाठी शासनाच्या विविध योजनांचा फायदा घ्या. वर्षाला वीस हजार पेक्षा कमी सरकारी नोकर्या उपलब्ध होत आहेत. त्यामुळे उद्योगामुळे रोजगार वाढले तर गुन्हेगारी कमी होईल. यावेळी , माजी आमदार दिनकर पाटील, आमदार सुधीर गाडगीळ ,महापौर संगीता खोत, आयुक्त रविंद्र खेबुडकर भाजप नेत्या नीता केळकर यांची भाषणे झाली. शेखर इनामदार, मकरंद देशपांडे उपस्थित होते.