बहुजननामा ऑनलाईन टीम – राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गातील शिक्षकांची १२ हजार ४०० पदे भरण्याचा निर्णय तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक परिस्थितीचे कारण देत पदे भरण्यावर बंदी घातली. मात्र, १२ हजार ४०० पदांपैकी सहा हजार पदांची भरती पूर्ण झाली. आता ३ डिसेंबरला बैठक झाली. त्या बैठकीतील निर्णयानुसार या पदभरतीवरील बंदी उठविली. त्यानुसार पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरु असलेली शिक्षणसेवक पदभरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.
शिक्षण आयुक्त सोळंकी म्हणाले…
तत्कालीन फडणवीस सरकारने १२ हजार १४० पदांची शिक्षक भरती जाहीर केली होती.
– भरती होणाऱ्या एकूण पदांपैकी सहा हजार पदांच्या भरतीस वित्त विभागाने परवानगी दिली आहे.
– वित्त विभागाने शिक्षक पदभरतीवरील बंदी उठविली आहे.उर्वरित पदांची भरती पवित्र पोर्टलवरुन होणार आहे.
– पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गांवरील सहा हजार पदांची भरती होईल.
– पवित्र पोर्टलद्वारे यापूर्वी जाहिरात प्रसिध्द झाली होती. या जाहिरातीनुसार उर्वरित पदांची लवकरच भरती होईल.
दरम्यान, कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थितीही अडचणीतच आहे. त्यामुळे वित्त विभागाने वैद्यकीय वगळता अन्य कोणत्याही विभागातील नवी पदभरती करु नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांची पदे रिक्त असतानाही नव्या शिक्षक भरतीचा निर्णय तुर्तास होणार नाही, असंही सांगण्यात येत आहे. राज्यातील शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. तरीही १० ते २० पटसंख्या असलेल्या सुमारे साडेसतरा हजार शाळांचे अन्य ठिकाणच्या शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे. आता या शाळांवरील सुमारे दहा हजारांहून अधिक शिक्षक अतिरिक्त होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
वाढत्या महागाईच्या काळात मानधन रकमेवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहही भागू शकत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही शिक्षणसेवक पद रद्द करा अथवा मानधनवाढीची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. मात्र, त्यावर अद्याप काहीच निर्णय झालेला नसून शिक्षण आयुक्तांचा प्रस्तव वित्त विभागाकडे तसाच पडून आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गावर शिकविणाऱ्या शिक्षकांना दरमहा सहा हजार रुपयांवर सलग तीन वर्षे काम करावे लागत आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांना नऊ हजारांचे मानधन दिलं जातं.