लातूर : बहुजननामा ऑनलाइन – ५ व १९ डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार सरळ सेवा भरतीत मराठा समाज (एसईबीसी) प्रवर्गास १६ टक्के जागा देण्याचा निर्णय जाहीर झाला होता. त्यानुसार शिक्षक भरतीतील मराठा प्रवर्गाची १६ टक्के पदे याच शिक्षक भरतीत भरावी, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अ. भा. छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, राहुल पुंड, गोकुळ घोगरे व विवेक धांडे यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिले आहे. सध्या शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावली अद्ययावत करून मागासवर्गीय कक्ष आयोगाकडून मंजूर करून घेत असताना जिथे खुला प्रवर्ग अतिरिक्त आहे, अशा जिल्ह्यात एसईबीसीच्या जागा निरंक दाखविल्या जात आहेत. पर्यायाने २४ हजार शिक्षक भरतीत मराठा तरुणांना डावलले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. शिवाय एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या शिक्षक, वस्तीशाळा शिक्षकांना सरसकट खुल्या प्रवर्गावर दाखविल्याने राज्यात खुला प्रवर्ग अतिरिक्त ठरत आहे.