नंदुरबार : बहुजननामा ऑनलाईन – भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्यात होत असलेल्या भाजपा-सेना युतीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चिमटा काढण्याच्या भरात गोसावी समाजाबद्दल अपशब्द काढले. याचा गोसावी समाज बांधवांकडून तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे. दशनाम गोसावी समाजाच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी जितेंद्र जगदाळे यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून दानवेंनी जाहीर माफी मागावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याची दखल न घेतल्यास दानवेंच्या मतदार संघात जावुन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
दशनाम गोसावी समाज संस्थेचे खान्देश अध्यक्ष साहेबराव गोसावी व जिल्हाध्यक्ष अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालच्या परिसरात घोषणाबाजी करून दानवेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. सदरच्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एका मुलाखतीत भाजपा-सेना युती झालेली असतांना त्यांच्या विरोधाच्या बाबतीत विचारल्या गेलेल्या प्रश्नाविषयी उत्तर देतांना गोसावी समाजाविषयी अपशब्द वापरले. यामुळे गोसावी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.यामुळे राज्यभरात दानवेंच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे.सोशल मिडीयावरूनही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत दशनाम गोसावी समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात दानवेंनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. याची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नंदुरबार येथील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी समाजाचे खान्देश अध्यक्ष साहेबराव गोसावी, जिल्हाध्यक्ष अमोल भारती, कार्याध्यक्ष अशोकपुरी गोसावी, भाऊसाहेब गोसावी, नंदुगीर गोसावी, राजेंद्र गोसावी, हिंम्मत गोसावी, वैभव भारती, विनोद गोसावी, धर्मेंद्र गोसावी, निकीता गोसावी, सुभाष गोसावी, ज्योती गोसावी, दीपक गोसावी, संजय गोसावी, सुनिल गोसावी, संतोष गोसावी, गणेश गोसावी, पंकज गोसावी आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एका मुलाखतीदरम्यान गोसावी समाजाबद्दल अपशब्द काढले. यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर टिकेची झोड उसळली. याची दखल घेत रावसाहेब दानवे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, कोणत्याही समाजाला दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता. प्रश्नाच्या अनुषंगाने आपण म्हणीचा वापर केला.