मुंबई : बहुजनामा ऑनलाईन – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याच्यासोबत वंचित बहुजन आघाडी यांचा लोकसभा निवडणुकीसाठी ताळमेळ जमला नाही. त्यामुळे राज्यात शेतकरी, कामगार आणि फुले-शाहू आंबेडकरी विचारांच्या पक्ष-संघटनांची राष्ट्रीय बहुजन आघाडी लोकसभेच्या मैदानात उतरली आहे. असे डॉ. सुरेश माने यांनी सांगितले.
यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या प्रमुख नेतृत्वाखाली भाजप-सेना सोबतच बिगर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे अनेक पक्ष आणि संघटना सामील झाल्या आहेत. यामुळे या राष्ट्रीय बहुजन आघाडीकडून राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार केला आहे.
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्हीही पक्ष राज्यातील इतर नवीन पक्षांना या निवडणुकीत सामावून घेतील असे वाटत होते. परंतु, तसे होताना दिसत नाही. तर दुसऱ्या बाजूला अॅड. प्रकाश आंबेडकर हे आपल्या वंचित आघाडीत इतर वंचित आणि नवीन घटकांना स्थान देत नाहीत. यामुळे आम्ही राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आघाडीचे प्रमुख डॉ. सुरेश माने यांनी दिली.
राज्यात विदर्भवादी मंचासह अनेक पक्ष संघटनांची मिळून ही आघाडी बनली आहे. यामुळे या निवडणुकीच्या उमेदवार आणि त्यांच्या प्रचारासाठी ३ मार्च रोजी नागपुरातील कस्तुरी पार्क मैदानात भव्य सत्ता परिवर्तन रॅलीने याची सुरुवात होणार असल्याची माहितीही डॉ. माने यांनी दिली.