मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने अँटीजेन टेस्ट मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. त्यामुळे तपासणी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र आता कोरोना चाचणी करण्यासाठी रुग्णालयात किंवा डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. कारण भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएआर) रॅपिड अँटिजन किटच्या सहाय्याने घरातच कोरोना चाचणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. या किटच्या वापरासंबंधात आयसीएमआरकडून काही मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, आयसीएमआरने हा निर्णय जाहीर करताना ज्यांना लक्षणं आहेत तसंच जे प्रयोगशाळेतील चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांनीच याचा वापर करावा असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सरसकट चाचणी करु नये असेही आयसीएमआरने म्हंटले आहे. जे पॉझिटिव्ह आले आहेत त्यांना ट्रू पॉझिटिव्ह म्हणून ग्राह्य धरलं जाईल. त्यामुळे त्यांना पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षणे नाहीत असे लोक अँटीजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह आले आहेत त्यांनी तात्काळ आरटीपीसीआर टेस्ट करुन घ्यावी, असंही आयसीएमआरने सांगितले आहे.
पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स लिमिटेड कंपनीच्या रॅपिड अँटिजन टेस्ट किटला आयसीएमआरकडून मान्यता देण्यात आली आहे. मायलॅबने The CoviSelfTM (PathoCatch) COVID-19 OTC Antigen LF device ची निर्मिती केली आहे. या किटच्या माध्यमातून घरी टेस्ट करायची झाल्यास सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर आणि अँपल स्टोअरमधून अँप डाऊनलोड करावं लागणार आहे. या अँपमध्ये देण्यात आलेल्या प्रक्रियेनुसारच चाचणी करता येईल.
मोबाईल अँप चाचणी प्रक्रियेची विस्तृतपणे माहिती देईल आणि रुग्ण निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह याचा निकाल देईल. सर्व युजर्सनी अँप डाऊनलोड केलं आहे त्याच मोबाइलवरुन चाचणी पूर्ण झाल्यानंतर टेस्ट स्ट्रिपचा फोटो काढावा. विशेष म्हणजे आयसीएमआरच्या कोविड टेस्टिंग पोर्टलसोबत जोडल्या गेलेल्या सुरक्षित सर्वरमध्ये फोनमधील डाटा साठवला जाईल. त्याचबरोबर या डेटा संदर्भात गोपनीयता राखली जाईल असे आश्वासनही आयसीएमआरने दिली आहे.
सध्या प्रयोगशाळांवर मोठ्या प्रमाणात ताण आहे. या होम किटमुळे हा ताण कमी होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या २४ तासांत २० लाख ८ हजार २९६ नमुने घेत नवा विक्रम करण्यात आला आहे. परंतु आकडेवारी पाहिली तर पूर्ण क्षमतेने चाचण्या होत नसल्याचे समोर येते. दिवसाला ३३ लाख चाचण्यांची क्षमता असताना देशात सरासरी १८ लाख चाचण्या होत आहेत.