मुंबई : बॉलिवूडमधील कपूर आणि भट्ट फॅमिली राजस्थानातील रणभंबोर येथे दाखल झाले आहे. नव वर्षाच्या स्वागतासाठी ते येथे आले असले तरी आज रणबीर आणि आलिया यांचा साखरपुडा होणार असल्याची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूरने आपण लवकरच आलिया भट्टशी लग्न करणार असल्याचे सांगितले होते. एका मुलाखतीदरम्यान रणबीर याने सांगितले की, जर कोविड १९ नसते, तर आतापर्यंत आपले लग्न झाले असते. ही जोडी लवकरच विवाह बंधनात बांधणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये आहे.
राजस्थानातील रणभंबोर येथे रणबीर कपूर, आलिया भट्ट, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण ही मंडळी आली आहेत. रणबीर कपूर हा त्याच्या कुटुंबासमवेत असून आलियाही तिच्या कुटुंबासह आली आहे.
नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सुट्टी उत्साहात सुरुवात करत असल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेता रणवीर सिंगही दिसत आहे. कपूर आणि भट्ट फॅमिली राजस्थानातील रणभंबोर येथे आली असल्याने आज रणबीर आणि आलिया यांचा साखरपुडा होण्याची शक्यता आहे. त्या दोघांचा एकत्रित फोटो कधी पहायला मिळेल, याची बॉलिवूड व त्यांच्या चाहत्यांना प्रतिक्षा आहे.