शिर्डी : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या राजकारणात ईडी (ED) नोटीसीमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेच्या नेत्यांना आणि कुटुंबीयांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आपल्या कवितेमुळे भल्याभल्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटला कवितेतून उत्तर दिले आहे. मी पित नाही बिडी, मग कशाला मागेल लागेल ईडी असे म्हणत संजय राऊतांना टोला लगावला. ते आज शिर्डीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी गाण्याच्या ओळी ट्विट केल्या होत्या. त्यानंतर या ट्विटची बरीच चर्चा झाली. आ देखे जरा किसमे कितना है दम, असे ट्विट राऊत यांनी केले. त्याला उत्तर देताना आठवले म्हणाले, किसमे कितना है दम, तो हम भी नही कुछ कम, असा टोला लगावला आहे. ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे. ती पक्ष पाहून काम करत नाही. भाजपाच्या लोकांनाही ईडीच्या नोटीसा येतात. मात्र, आपला कोणताही व्यवसाय नाही. त्यामुळे आपल्याला ईडीची भीती वाटत नसल्याचे आठवले यांनी सांगितले.
यावेळी पत्रकारांनी आठवले यांना तुम्हाला ईडीची नोटीस आली का ? असा सवाल विचारला असता आठवलेंनी पत्रकारांच्या प्रश्नाला कवितेतून उत्तर दिले. ते म्हणाले, माझ्याकडे कधी ईडी येणार नाही. जरी ईडीची नोटीस मला आली तर मी गो कोरोना गो म्हणेन. तसा माझा आणि ईडीचा काही संबंध नाही. मुळात मि पित नाही बिडी मग माझ्या मागे का लागेल ईडी, असे आठवले म्हणाले. पैसा कमावावा, पण तो सदनशीर मार्गाने कमावावा. योग्य ते कर भरावेत. कागदपत्रे पूर्ण करावीत. असे असेल तर कशाला अशी कारवाई होईल असा टोला त्यांनी राऊतांना लगावला.