सातारा : बहुजननामा ऑनलाईन – जिल्ह्यात काही गल्लीतील नेते दिल्लीच्या गप्पा मारत असून अशा नामधारी नेतृत्वामुळे दलित, बहुजन नेते बदनाम होत आहेत व सत्तेपासून वंचित रहात आहेत. यांच्यामुळे दिल्लीत सोडाच, पण गल्लीतही स्थान मिळत नाही. मात्र, रिपब्लिकन ब्ल्यू फोर्ससाठी रामदास आठवले हे जो निर्णय केंद्रात घेतील तो आमच्यासाठी आदेश असेल, असे प्रतिपादन रिपाइं ब्ल्यू फोर्सचे जिल्हा नेते दादासाहेब ओव्हाळ यांनी व्यक्त केले.
जावली तालुका रिपब्लिकन ब्ल्यू फोर्सची मेढ्यात शासकीय विश्रामगृहावर जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ओव्हाळ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अजित नलावडे, जिल्हा सचिव किरण बगाडे, उपाध्यक्ष राम भोसले, संघटक गणेश भिसे, जावली तालुकाध्यक्ष अमित साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
ओव्हाळ पुढे म्हणाले, आम्हाला काही मिळो अथवा न मिळो, पण आठवले हे भाजपाबरोबर आहेत, म्हणून रिपाइंचा सच्चा कार्यकर्ता व ब्ल्यू फोर्स काल आज आणि उद्याही भाजपासोबतच राहील. काहीजण राष्ट्रीय अध्यक्षांना चॅलेंज देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची किव करावी वाटते. आघाडी सरकारच्या काळात यांनी किती कमिटीचा लाभ घेतला ते सांगावे. अशा हट्टी व कंजूष नेतृत्वामुळे रिपाइंवर टीका होतेय. या नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांची घरे मोडणे बंद करावे, असेही ओव्हाळ म्हणाले. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मागासवर्गीयांवर होणारे अन्याय अत्याचार, विविध शासकीय योजना, घरकुल योजना इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटना वाढण्यास सर्वतोपरीने मदत केली जाईल, असे आश्वासन दादासाहेब ओव्हाळ यांनी दिले.
बैठकीला जिल्हा सदस्य अनिल उमापे, जगदीश झेंडे, ज्येष्ठ मार्गदर्शक संपत सोनावणे, महाबळेश्वर अध्यक्ष अमित मोरे, कार्याध्यक्ष राजू डोंगरे, जावली कार्याध्यक्ष सनी गायकवाड, सचिव किरण कांबळे, उपाध्यक्ष किरण खरात, संघटक महेंद्र रोकडे, जगदीश घोडके, आनंदा साळुंखे, संदीप आप्पा साळुंखे, उमेश साळुंखे, राम निंबाळकर, आदित्य शिंदे, पप्पू गायकवाड, उमेश गायकवाड, रोहित परिहार, शुभम बगाडे, अर्जुन मुकने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.