नवी दिल्ली : वृत्तसंथा – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडलेल्या सुरक्षा सुधारणा विधेयकाला (SPG Bill) राज्यसभेत मंजूरी देण्यात आली आहे. काँग्रेसने या विधेयकाला प्रखर विरोध दर्शवला मात्र तरीही राज्यसभेतही आवाजी मतदानाने सुरक्षा एसपीजी विधेयक मंजूर करण्यात आले. काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत सभात्याग केला. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे यापुढे केवळ विद्यमान पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच एसपीजी सुरक्षा मिळणार आहे. त्यामुळे आता माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना ही सुरक्षा मिळणार नाही.
दरम्यान, याआधी लोकसभेत मंजूर झालेले सुरक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेतही मांडण्यात आले. या विधेयकावर काँग्रेसने विरोध दर्शविल्याने यावर जोरदार चर्चा झाली. गांधी घराण्याची सुरक्षा हटविण्यात आल्यानंतर मोदी सरकारवर जोरदार टीका झाली. त्यानंतर हे विधेयक केवळ एका कुटुंबाच्या हितासाठी आणण्यात आलेले नाही, असे म्हणत अमित शहा यांनी गांधी घराण्यावर जोरदार टीका केली. तसेच गांधी कुटुंबीयांची सुरक्षा हटवण्यात आलेली नाही, तर ती बदलण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकशाहीमध्ये कायदा प्रत्येकासाठी समान असतो, एखाद्या कुटुंबासाठी नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. त्यामुळे माजी पंतप्रधानांचे एसपीजी कव्हर देखील मागे घेण्यात आले आहे. नरसिंह राव, चंद्रशेकर, आय.के. गुजराल, मनमोहन सिंग या माजी पंतप्रधानांची सुरक्षा काढण्यात आली आहे.